मुंबई : लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर देशात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल, मात्र अंतिम निकाल येण्याआधीच अनेकांनी आपले अंदाजपंचे निकाल मांडायला सुरुवात केली आहे. एनडीए पुन्हा आपली सत्ता स्थापन करणार का? भाजपला एकहाती बहुमत मिळणार का? की देशात सत्तापालट होऊन यूपीए सरकार स्थापन करणार? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात आहेत. बस, ट्रेन, ऑफिस, घर सर्वच ठिकाणी या मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे. मतदारांच्या मनातील प्रश्नांना अंधुकशी उत्तरं देणारा किरण म्हणजेच मतदानोत्तर जनमत चाचणी. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एक्झिट पोल.


एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अचूक अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जातो. एक्झिट पोलमधून तंतोतंत आकडेवारी समोर येत नसली, तरी मतदारांचे प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात शमतात. कारण एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात.

एक्झिट पोल जाहीर करायची वेळ काय?

एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर करण्यास परवानगी आहे. देशात यंदा सातही टप्प्यांतील मतदान झाल्यानंतरच एक्झिट पोल हा टीव्ही किंवा वृत्तपत्रांमधून जाहीर करता येणार आहे. त्यानुसार 19 मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजल्यानंतर एक्झिट पोल जाहीर केला जाईल.

Election Commission | एक्झिट पोलसंबंधी ट्वीट काढून टाकण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश



एक्झिट पोलचं सर्वेक्षण कसं घेतलं जातं?

मतदानानंतर तात्काळ मतदारांचा कौल विचारुन गोळा केलेली आकडेवारी एक्झिट पोलसाठी वापरली जातो. संबंधित मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणारा ठराविक क्रमाकांचा (दहावा, विसावा, पंचविसावा) मतदार सॅम्पल म्हणून निवडला जातो. मतदान करुन आल्यानंतर कोणाला मत दिलं, असा थेट प्रश्न मतदाराला विचारला जातो. मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज वर्तवला जातो.

लोकसभा निकालाआधी राजकीय हालचालींना वेग, 24 तासात दुसऱ्यांदा चंद्राबाबू नायडू शरद पवार-राहुल गांधींना

एक्झिट पोलमध्ये सर्वसाधारणपणे कोणते प्रश्न विचारतात?

पंतप्रधान म्हणून कोणत्या नेत्याला पसंती?
विद्यमान पंतप्रधानांची कामगिरी कशी?
कोणत्या पक्षाची कामगिरी समाधानकारक?
सत्ताधारी सरकारने केलेल्या कामांबाबत समाधानी आहात?

एक्झिट पोल करणारी संस्था कोणत्या गोष्टी ध्यानात घेते?

-कोणत्या टप्प्यामध्ये किती टक्के मतदान
-नवमतदारांची संख्या

एक्झिट पोलशी संबंधीचे ट्वीट तातडीने हटवा, निवडणूक आयोगाचे ट्विटर इंडियाला आदेश

मतदारांनी दिलेली माहिती, एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थांनी मांडलेला निष्कर्ष, राजकीय विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात.

एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल वेगवेगळे का?

ओपिनियन पोल मतदानापूर्वी सादर केला जातो, तर एक्झिट पोल हा सर्व टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर. ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. मतदान होण्यापूर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतल्याने त्याचे निष्कर्ष बदलण्याची शक्यता असते.

देशातील पहिला एक्झिट पोल कधी झाला?


राजधानी दिल्लीतील सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस)ने केलेला एक्झिट पोल हा देशातील पहिला एक्झिट पोल मानला जातो. दूरदर्शनने 1996 साली देशातला पहिला एक्झिट पोल घेतला होता.