UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका बसला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजप पक्षाचाही राजीनामा दिला असून ते आता समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत तीन आमदारांनीही राजीनामा दिला आहे. 


 






ट्विटरवरुन दिला राजीनामा
स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा ट्विटरवरुन दिला आहे. दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि व्यापाऱ्यांची घोर उपेक्षा झाल्यामुळे मी योगी मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


 






कोण आहेत स्वामी प्रसाद मौर्य?


स्वामी प्रसाद मौर्य हे पाच टर्म आमदार असून त्यांची राजकीय कारकीर्द तब्बल 40 वर्षांची आहे. सन 2016 पर्यंत ते मायवतींसोबत बसपाचा चेहरा म्हणून होते. 2017 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा विधानसभेत निवडून गेले. स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशमधील मागास समाजाचा मोठा चेहरा समजले जातात. त्यामुळे त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर स्वामी प्रसाद मौर्यांनी भाजपला रामराम केला असून सपाच्या सायकलीवर सवार झाले आहेत. 


मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याबरोबर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी एक ट्वीट केलं असून त्यात त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. 


स्वामी प्रसाद मोर्य यांनी मंत्रिपद सोडलं, पक्षही सोडला. पण त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य या भाजपच्या खासदार आहेत. त्या मात्र भाजपमध्येत राहणार आहेत. पण, स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर मंत्री धर्म सिंह सैनी आणि दारा सिंह चौहान यांच्याही राजीनाम्याची चर्चा सुरु झाली आहे. हे तिघेही बसपाचे प्रमुख नेते होते. नंतर भाजपमध्ये थेट मुख्यमंत्री योगींच्या गटातले नेते बनले. आता त्यांच्यातल्या एका मंत्र्यानं पक्ष सोडला.


उत्तर प्रदेशमध्ये जातीय समीकरणाला महत्व
उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राइतकंच जातीय समीकरणांचं महत्व आहे. तिथं ओबीसी समाजाचं अनेक मतदारसंघांमध्ये वर्चस्व आहे. तर काही मतदारसंघांमध्ये याच मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य यांचं जाण्यानं भाजपला फटका बसणार की मोदी-योगींच्या झंझावातासमोर त्याचा काहीही परिणाम होणार नाही हे 10 मार्चलाच कळेल. 


संबंधित बातम्या :