सांगली : राहुल गांधी वीर सावरकरांना भित्रा म्हणतात. सावरकरांना भित्रा म्हणणारा राहुल गांधीसारखा नालायक माणूस संसदेत पोचता कामा नये, असे शब्दात एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. सोबतच राजू शेट्टींना मागील वेळेस त्यांना पाठींबा दिला ही माझी चूक होती, असेही ठाकरे म्हणाले.


हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्लामपूरमध्ये सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

सावरकरांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचं साहित्य वाचण्याचा सल्लाही ठाकरे यांनी राहुल गांधींना दिला.  मराठी समजत नसेल तर इटलीच्या भाषेत लिहून घेऊन भाषण करण्याचा सल्ला देत ही इटली नाही भारत आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. वीर सावरकरांनी देशासाठी जे कष्ट भोगलंय तसं कष्ट जर नेहरूंनी भोगलं असतं  तर मी त्यांनाही वीर जवाहरलाल नेहरू बोलायला तयार आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

VIDEO | आमचं टॉप टू बॉटम एकच मोदी एके मोदी, गुलाबराव पाटलांचं तुफानी भाषण | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा



मागील वेळी चुकीच्या माणसासाठी हातकणंगलेची जागा सोडली होती. पण ती माझी चूक आता तुम्ही जनतेने सुधारायची आहे. गेल्यावेळी नको त्या माणसाला जागा दिली असे म्हणत ठाकरे यांनी शेट्टींवर टीका केली.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी राजू शेट्टींसह शरद पवारांवर टीका केली. राजू शेट्टींना पाडायला भाजप- सेनेची गरज नाही, त्यांना पाडायला शरद पवार पुरेसे आहेत, असे पाटील यावेळी म्हणाले. पवारांनी आतापर्यंत वसंतदादा पाटील, विखेंना फसवले आहे, असे देखील ते म्हणाले.

यावेळी राजू शेट्टी म्हणजे उसाला लागेलेलं कोल्हं आहे. या कोल्ह्याला हाकलून लावायचे आहे. हा कोल्हा कारखानादाराच्या मांडीला मांडी लावून नव्हे तर मांडीवर जाऊन बसलाय, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर  बोचरी टीका केली.