मुंबई :  लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांची सुध्दा निवडणूक सदिच्छा दूत (ॲम्बेसेंडर) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाने पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील व्यक्तीची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.


2004, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी अशी नोंद नव्हती. सन 2014 च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती.  2014 मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये 918 मतदारांची नोंद करण्यात आली. पाच वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुप्पटीने वाढला असून आता ही संख्या 2,086 इतकी झाली आहे. भिवंडी, कल्याण, मुंबई उत्तर आणि मुंबई पूर्व या चार मतदारसंघात अनुक्रमे 113, 184, 324 आणि 123 तृतीयपंथाची नोंद झाली आहे. मुंबई उत्तर या मतदारसंघातून 324 सर्वाधिक तृतीयपंथीची नोंद झाली आहे.

गौरी सावंत यांच्या नेमणुकीमुळे अधिकाधिक तृतीयपंथीची शेवटच्या टप्प्यातील नावनोंदणी करण्यास मदत होईल.येत्या काही दिवसांत गौरी सावंत या तृतीयपंथी यांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता, मतदानाचा हक्क या बाबत सांगणार आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या नवमतदारासह अधिकाधिक मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत नामवंत खेळाडू, चित्रपट कलावंत, साहित्यिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2014 साली तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला. आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली. 2019 मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत तर तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मतदारांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे दिसून आले आहे. याचाच अर्थ आज तृतीयपंथी सुध्दा आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग असून मतदान नावनोंदणीसाठी पुढे येत आहे.

महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार, सर्वात जास्त मतदार ठाण्यात तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सर्वाधिक महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची सर्वाधिक आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये सात लाख 35 हजार 597 एवढ्या महिला मतदारांची संख्या आहे. ठाणे मतदार संघात राज्यात सर्वाधिक सुमारे 23 लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून 12 लाख 60 हजारांहून अधिक पुरूष मतदारांची संख्या आहे.

राज्यात  11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. राज्यात चार कोटी 57 लाखांहून अधिक पुरूष मतदार असून चार कोटी सोळा लाखाहून अधिक महिला मतदार आहेत.

नऊ मतदारसंघ राखीव

नंदूरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

नागपूर, शिरूर,पुणे, बारामतीत 20 लाखांहून अधिक मतदार
मावळ मतदारसंघात सुमारे 22 लाखांहून अधिक, शिरूर 21 लाखांहून अधिक, नागपूर 21 लाखांहून अधिक, पुणे आणि बारामती प्रत्येकी 20 लाखांहून अधिक मतदार आहेत. मुंबईतील मुंबई-उत्तर मतदारसंघात 16 लाखांहून अधिक मतदार असून मुंबई-उत्तर दक्षिण मतदारसंघात 16 लाख 98 हजार मतदार आहेत. तर मुंबई-उत्तर पूर्व मतदारसंघात 15 लाख 58 हजार मतदार आहेत. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात 16 लाख 48 हजार आणि मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात 14 लाख 15 हजार एवढे मतदार आहेत.

मतदारसंघनिहाय एकूण मतदारांची संख्या (सुमारे) :
नंदूरबार-18 लाख 50 हजार
धुळे-18 लाख 74 हजार
जळगाव-19 लाख 10 हजार
रावेर-17 लाख 60 हजार
बुलढाणा-17 लाख 46 हजार
अकोला-18 लाख 54 हजार
अमरावती-18 लाख 12 हजार
वर्धा-17 लाख 23 हजार
रामटेक-18 लाख 97 हजार
भंडारा-गोंदिया-17 लाख 91 हजार
गडचिरोली-चिमूर-15 लाख 68 हजार
चंद्रपूर-18 लाख 90 हजार
यवतमाळ-वाशिम-18 लाख 90 हजार
हिंगोली-17 लाख 16 हजार
नांदेड-17 लाख
परभणी-19 लाख 70 हजार
जालना-18 लाख 43 हजार
औरंगाबाद-18 लाख 57 हजार
दिंडोरी-17 लाख
नाशिक-18 लाख 51 हजार
पालघर-18 लाख 13 हजार
भिवंडी-18 लाख 58 हजार
कल्याण-19 लाख 27 हजार
रायगड-16 लाख 37 हजार
अहमदनगर-18 लाख 31 हजार
शिर्डी-15 लाख 61 हजार
बीड-20 लाख 28 हजार
उस्मानाबाद-18 लाख 71 हजार
लातूर-18 लाख 60 हजार
सोलापूर-18 लाख 20 हजार
माढा-18 लाख 86 हजार
सांगली-17 लाख 92 हजार
सातारा-18 लाख 23 हजार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग-14 लाख 40 हजार
कोल्हापूर-18 लाख 68 हजार
हातकणंगले-17 लाख 65 हजार