नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यावेळी निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून सोशल मीडियावर देण्यात येणाऱ्या जाहिरातींवरही निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक अर्ज भरताना आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सची  माहिती द्यावी लागणार आहे. तसेच सोशल मीडियावर जाहीरात करण्यासाठी आयोगाची परवानगी आवश्यक असणार आहे.

निवडणूक आयोगाने गुगल, फेसबूक, ट्विटर तसेच युट्यूबला सर्व राजकीय जाहिराती तपासून घेण्यास सांगितले आहे. समाजमाध्यमांवरील राजकीय जाहिरातींच्या संबंधातील तक्रारी स्वीकारण्यासाठी एका तक्रार अधिकाऱ्याचीही (ग्रिव्हन्स ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावर निवडणूक प्रचारादरम्यान केल्या जाणाऱ्या खर्चाची निवडणूक खर्चात नोंद करण्यात येणार आहे.

देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच कालपासून देशात आचारसंहिता लागू झाली आहे.

संबंधित बातम्या

लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, ट्विटरवरुन माहिती

देशात 7 टप्प्यात निवडणुका, आचारसंहिता लागू | नवी दिल्ली | एबीपी माझा