लोकसभा निवडणुकीत कायमच निर्णायक भूमिका बजावणारा, आपला बाणा दाखविणारा नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा सिन्नर विधानसभा मतदारसंघ. व्यक्ती केंद्रित, नातेगोते आणि जातीवर आधारित,  राजकीय समज असणारा मतदारसंघ म्हणून सिन्नरकरांची ओळख आहे. कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचं इथे वर्चस्व राहिलंय. 2014  विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनचा भगवा डौलाने फडकवला.

कॉंग्रेस, शिवसेना असा प्रवास करून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा 20 हजारांनी पराभव केला. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजाभाऊ वाजे आणि माणिकराव कोकाटे यांच्यात लढाई होण्याची दाट शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांनी अजून आपले पत्ते खुले केले नसले तरी लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करून युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासमोर त्यांनी आव्हान उभं केलं होतं. सिन्नरकर जनताही आपल्या भूमिपुत्राच्या मागे ठामपणे उभी राहिली. लोकसभेला सिन्नर मतदारसंघात हेमंत गोडसेपेक्षा 35 हजारांचं मताधिक्य कोकाटेंनी मिळवल्याने आपल्याला मिळालेल्या 91 हजार 914 मतांच्या अधावारावर सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे.

शिवसेना भाजपची ऐनवेळी कुठल्या कारणावरून युती तुटली तर भाजपचे उमेदवार म्हणून कोकाटे निवडणुकीच्या रणांगणात उतरू शकतात. अन्यथा पुन्हा एकदा आघाडीचा दरवाजा ठोठावण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. लोकसभा निवडणूक अपक्ष लढविल्याने पुन्हा एकदा विधानसभेला अपक्ष समोर जाण्याचं धाडस ते दाखविणार का याकडेही लक्ष लागलंय. तर दुसरीकडे शिवसेनेकडून राजाभाऊ वाजे यांचे तिकट जवळपास निश्चित मानलं जातंय. मितभाषी, लो-प्रोफाईल अशी वाजेंची ओळख आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांचे पती उदय सांगळे यांचंही संघटन चांगलं असून राजाभाऊ वाजेंच्या विजयात सांगळे यांचा चांगला हातभार राहिल्याने त्यांचं नाव अनेकवेळा चर्चेत येतं. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपद असल्याने निदान या निवडणुकीत तरी आमदारकीच्या तिकिटाच्या स्पर्धेपासून त्यांना दूर रहावं लागणार आहे.  तर जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या सीमंतिनी कोकाटे या आपल्या कन्येला ऐनवेळी माणिकराव पुढे करू शकतात. कॉंग्रेसकडून तालुका अध्यक्ष विनायक सांगळे तयारी करत आहेत. राष्टवादी कॉंग्रेसनेही आपले मोहरे पुढे सरकवण्यास सुरवात केली आहे. बाळासाहेब वाघ, कोंडाजीमामा आव्हाड  आणि राजाराम मुरकुटे यांची नावे चर्चेत आहेत.



सिन्नर विधानसभा मतदारसंघात मराठा आणि वंजारी समाजाचं प्राबल्य आहे. मराठा समाज विभागला गेला तरी देखील वंजारी समाजाची मते कोणाच्या पाठीशी उभे राहतील त्यावर विजयाच गणित अवलंबून आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत  वंजारी समाज वाजे यांच्या पाठीशी उभे राहिल्याने कोकाटेना मात देता आली.

1985 पासून आतापर्यंत 7 निवडणुकामध्ये शिवसेनेचे आमदार तीनवेळा निवडून आलेत तर कॉंग्रेसचे तीनवेळा.  1995 मध्ये अपक्ष उमेदवार असणाऱ्या तुकाराम दिघोळे यांना सिन्नरकरांनी आशीर्वाद दिले होते. त्या आधी सलग दोन वेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर दिघोळे आमदार राहिले होते. माणिकराव कोकाटेही 1999 आणि 2004 शिवसेना आणि 2009 मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार राहिले आहेत.


या मतदार संघाचं आणखी एक वैशिट्य म्हणजे एकदा आमदारकीची माळ गळ्यात पडली तर ती दोन किवा तीन पंचवार्षिक उतरत नाही. 1978 आणि 80 या दोन निवडणुकामध्ये सूर्यभान गडाख यांनी नेतृत्व केलं.  1985 ते 95 या तीन विधानसभा निवडणुकात तुकाराम दिघोळे यांनी विजय मिळवला. दोन वेळा कॉंग्रेसकडून आणि 1995 ला अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दिघोळेच्या रूपाने युती सरकारच्या काळात तालुक्याला उर्जाराज्य मंत्रीपदाचा बहुमान मिळाला. तर 1999 ते 2009 या तीन पंचवार्षिकमध्ये माणिकराव कोकाटे दोनवेळा शिवसेनेकडून आणि 2009 मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत. आता राजभाऊ वाजे पहिल्यांदा आमदार आहेत, त्यामुळे सिन्नरकर परंपरेला साजेसं मतदान करणार का या चिंतेमुळे विरोधकांना धडकी भरली आहे.



मतदारसंघाचा विकास या मुद्यावर दर पंचवार्षिकला निवडणुका होतात मात्र सिन्नरकरांच्या आयुष्यात काही बदल घडत नाही. सिन्नर तालुक्याचे पूर्व पश्चिम असे दोन भाग पडतात. पूर्वेकडे कायमच दुष्काळ असतो. पावसाळ्याचे दोन तीन महिने सोडले तर नद्या-नाले कायमच कोरड्याठाक पडलेल्या असतात. जानेवारी पासूनच विहिरी तळ गाठायला सुरवात करतात.  जिथे माणसानाच पाणी नाही तर जनावरांचे हाल काय विचारावे अशी परिस्थिती आहे. जनावरांच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न आणि दुष्काळ सिन्नरकरानच्या पाचवीलाच पूजलेला आहे. वर्षातील 8 ते 9 महिने टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.

तरीही इथला शेतकरी नवनवीन प्रयोग करत शेती करतो, कुठे शेडनेट ठिबकचा वापर करून आदर्श प्रस्थापित करतो. तर कोणी चंदनाची शेती करून शासनाचा पुरस्कार मिळवतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग इगतपुरी आणि सिन्नर या दोन्ही तालुक्यातून जाणार आहे. मात्र सर्वाधिक आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याची ताकद इथल्या शेतकऱ्यांनी दाखवली. आघाडी सरकारच्या काळात सेझ प्रकल्प मंजूर झाला होता, मात्र त्याचे पुढे काही झाले नाही.


सिन्नरला माळेगाव औद्योगिक वसाहत आहे, मात्र सोयीसुविधाचा अभाव आणि समस्या अधिक असल्याने उद्योग इथे स्थिरावत नाहीत. मुसळगावची औद्योगिक वसाहत सहकारी तत्वावर चालणारी आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. मात्र तिथेही नवीन उद्योग नसल्यान तरुणांना रोजगार नाही. रोजगाराच्या शोधात तरुणांना नाशिक शहरासह इतर तालुके जिल्ह्याची वाट धरावी लागते. त्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा कायमच चर्चेत असतो.

2014 विधानसभा निकाल

राजाभाऊ वाजे (शिवसेना)  1 लाख 4 हजार 31
माणिकराव कोकाटे (भाजप) 83 हजार 477
संपत काळे (कॉंग्रेस) 3 हजार 317
शुभांगी गर्जे (राष्टवादी कॉंग्रेस) 2 हजार 52

2019 लोकसभा निवडणुकीतील मतदान

हेमंत गोडसे (शिवसेना) 56 हजार 676
समीर भुजबळ (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 30 हजार 942
माणिकराव कोकाटे (अपक्ष) 91 हजार 914