मुंबई: केंद्रात भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांच्या साहाय्याने सरकार स्थापन केले तरी ते कितपत टिकेल, याबाबत शाश्वती नाही, अशी टिप्पणी ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून (Saamana) करण्यात आली आहे. याबाबत 'सामना'तून एक थिअरी मांडण्यात आली आहे. केंद्रात मोदी सरकार अस्तित्त्वात आले तरी ते एका व्यंगचित्राप्रमाणे आहे. संपूर्ण शरीरभर फॅक्चर व प्लॅस्टर लपेटलेले मोदी हे नितीश कुमार (Nitish Kumar) व चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) यांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत. त्या कुबड्यांच्या आधारेच त्यांना सरकार चालवावे लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील काय याची गॅरंटी नाही, असे 'सामना'त म्हटले आहे.


मोदींच्या भाजपला 240 जागा मिळाल्याचे सांगितले जाते. या आकड्यामध्येही घोळ आहे. एनडीए म्हणून 291 चा आकडा दाखवला जातोय तो फसवा आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी मोदी यांनी बहुमताचा कागद राष्ट्रपती भवनात सादर केला तरी तो कागद व त्यावरील बहुमताचा आकडा म्हणजे त्यांच्या 'एम.ए.' इन एन्टायर पॉलिटिक्स या डिग्रीप्रमाणे रहस्यमय असेल. मोदींकडे स्वतःचे बहुमत नाही व कुबडय़ांवरचे बहुमत मोदी यांच्या बाणेदार स्वभावास मानवणारे नाही, असा खोचक टोलाही 'सामना'तून लगावण्यात आला आहे.


मोदींच्या सभा आणि रोड शो फेल: सामना


भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या 240 जागा हा 'मोदी' बॅण्डचा चमत्कार नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपने हा आकडा गाठला.पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात 18 सभा व अनेक रोड शो केले. 18 पैकी 14 जागांवर भाजपचा पराभव झाला. मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले. भारतीय जनता पक्षाचा 'आरोप' होता की, महाराष्ट्रात मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे खासदार जिंकले. भाजपचा हा भ्रम या वेळी लोकांनी तोडला. उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन शिवसेनेचे नऊ खासदार जिंकले व शरद पवारांचा चेहरा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार विजयी झाले. उलट महाराष्ट्रात 'मोदी मोदी' करणाऱ्यांचा आकडा 23 वरून 9 वर आला. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या त्या मोदींशिवाय, ही बाब सामनातून अधोरेखित करण्यात आली आहे.


चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना सावधानतेचा इशारा


मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी शत्रुत्व केले तर ते फायद्याचे ठरते. मोदी व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो हा अनुभव आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे. बाबूंचे बोट धरून भाजप आंध्रात घुसला आहे. बाबूंना संपवायचा प्लॅन त्यांच्या डोक्यात घोळतच असेल. नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने दहा वर्षे दिल्लीत मोदी यांच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. दहा वर्षांनी ओडिशातून नवीन पटनायक व बिजू जनता दलास भाजपने संपवून टाकले. पटनायक हे आता वनवासातच गेले. देशभरात भाजपने हेच आणि हेच केले. भाजप हा मिठाला व शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्याबाबतीत प्रख्यात आहेत, अशी टीका 'सामना'तून करण्यात आली  आहे. 


मोदींच्या 'त्या' वक्तव्यावरुन 'सामना'ची खोचक टीका


नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरून खाली खेचले आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता व संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचा गैरफायदा मोदी घेत आहेत. भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याइतपत साधे बहुमतही मिळालेले नाही. 240 वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. लोकसभा निकालांनी मोदी यांना जमिनीवर आणले व त्यांनी सांगितले की, 'माझ्या आईच्या मृत्यूनंतरची ही माझी पहिली निवडणूक आहे.' चला, अखेर मोदी यांनी मान्य केले की, ते आकाशातील झग्यातून पडले नाहीत, तर त्यांचाही जन्म इतर मर्त्य मानवांप्रमाणे आईच्या कुशीतूनच झाला. मोदींना हे असे बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांच्या देवत्वाचा, अवतारगिरीचा व बाबागिरीचा मुखवटा खुद्द काशी नगरीतच जनतेने ओरबाडून काढला आहे. मोदी हे आता त्यांच्या 'बॅण्ड'चे म्हणजे मोदी सरकार बनवत नाहीत तर त्यांनी 'रालोआ'चे सरकार बनवत असल्याचे जाहीर करून स्वतःचा पराभव मान्य केला. 'मोदी सरकार', 'मोदी गॅरंटी', 'मोदी है तो मुमकीन है', 'मोदी तो भगवान है,' अशा फेकू कल्पनांना कालच्या निकालांनी केराची टोपली दाखवली, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.


मोदी आतापर्यंत एनडीए वगैरे मानायला तयार नव्हते, पण काशीच्या देवांनी प्रभू श्रीरामांना त्यांच्यातला अहंकार संपविण्यासाठी एनडीएच्या चरणी आणले. मोदींना या वेळी राम पावला नाही. कारण श्रीराम हा अहंकाराचा शत्रू आहे व अहंकाराचा पराभव करून त्याने अयोध्येचे रामराज्य स्थापन केले. वाराणसीचा प्रचार संपताच मोदी यांनी 10 कॅमेऱ्यांसह ध्यान सुरू केले, पण वाराणसीत त्यांचे मताधिक्य जोरदार घसरले. हा देवाचा प्रसादच म्हणावा लागेल, अशी टिप्पणीही अग्रलेखातून करण्यात आली आहे. 


आणखी वाचा


मोठी बातमी : 8 जूनला मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता