मुंबई : सतराव्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. आज (रविवार 10 मार्च) संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निवडणुकांच्या तारखांकडे लागून राहिलं आहे.


महाराष्ट्रात दोन ते तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर देशात सात ते आठ टप्प्यात निवडणूक होण्याचे संकेत आहेत. सोळाव्या लोकसभेची मुदत 3 जून 2019 रोजी संपते.

2014 मध्ये 16 व्या लोकसभेसाठी मतदान झालं होतं. 7 एप्रिल 2014 ते 12 मे 2014 या कालावधीत नऊ टप्प्यांमध्ये देशभरात मतदान प्रक्रिया पार पडली होती.

2014 च्या लोकसभा निवडणुकांची वैशिष्ट्ये

1. सात एप्रिल ते बारा मे अशा नऊ टप्प्यांमध्ये झालेली ही आजवरची सर्वात मोठी निवडणूक ठरली होती.

2. देशात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी पक्षाला पूर्ण बहुमत असलेलं सरकार सत्तेत आलं होतं.

3. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव, अवघ्या 44 जागांवर विजय, अनेक राज्यांमधे काँग्रेस खातंही उघडू शकलं नव्हतं

4. बसप, डीएमके, भाकप सारखे आजवर राष्ट्रीय राजकारणात भूमिका बजावणारे पक्ष 2014 ला भोपळाही फोडू शकले नव्हते

5. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत 66 टक्के मतदान झालं, आजवर लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान


लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी






2019 च्या लोकसभा निवडणुकांची वैशिष्ट्ये


1. अनेक देशांचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुका

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेससह 21 पक्षांची एकजूट

3. नरेंद्र मोदींचा करिष्मा चालणार की विरोधकांची महाआघाडी भाजपचं संस्थान खालसा करणार, याकडे लक्ष

4. लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपच्या हातून तीन राज्य निसटल्यामुळे उत्सुकता वाढली

5. एअरस्ट्राईक, नोटाबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांबाबत उत्सुकता