मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या, तरी महाराष्ट्र काँग्रेस अद्याप सुस्त असल्याचं चित्रं आहे. त्यामुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी राज्यातील नेत्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागावाटप, उमेदवारी याबाबत याआधीच निर्णय होणं अपेक्षित असताना, काहीच झालं नसल्याने पक्षश्रेष्ठी नाराज झाले आहेत.


राष्ट्रवादीबरोबरचा काही जागांचा तिढा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बरोबर घेण्याबाबत अडलेली चर्चा, उमेदवार निवडण्यातील ढिसाळपणा सध्या काँग्रेसमध्ये दिसत आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडून जे प्रयत्न व्हायला हवेत ते होताना दिसत नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसने जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी चांगले उमेदवार देण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत.
शिरुरसाठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र काँग्रेसमध्ये असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. राज्यातील काँग्रेस निद्रावस्थेत असल्याचं सध्याचं चित्र आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले बहुतांश उमेदवार निश्चित केले असून दुसरीकडे काँग्रेस मात्र उमेदवारांबाबत साधे निर्णयही घेऊ शकत नसल्याचं चित्र आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमधील भिजत घोंगडी

- दक्षिण अहमदनगरची जागा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांना मिळावी, यासाठी काँग्रेसकडून अद्याप विशेष प्रयत्न नाहीत. त्यामुळे सुजय हे उमेदवारीसाठी भाजपच्या पायऱ्या चढत असल्याचं चित्र आहे.

- नंदुरबारमध्ये भाजपच्या विद्यमान खासदार हीना गावित पुन्हा जिंकून येण्याची शक्यता आहे. गावित कुटुंबीय राष्ट्रवादीच्या संपर्कातही होतं. पण ही जागा सोडायची नाही या काँग्रेसच्या भूमिकेमुळे काही झालं नाही.

- जालन्यात अर्जुन खोतकर हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढण्याचा मानसिकतेत होते, पण त्यांना पक्षात घेऊन तिकीट देण्यासाठी नीट आखणी केली नाही.

- स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काँग्रेसच्या कोट्यातून वर्धा जागा सोडणे अपेक्षित आहे, राहुल गांधी यांनी सूचना देऊनही अद्याप याबाबत राज्य पातळीवर कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसांची मुदत दिली आहे.

- अनेक जागांवर युतीच्या उमेदवारांविरोधात रोष असूनही चांगले उमेदवार देण्यासाठी काँग्रेसची धडपड नाही

- सांगली, लातूर, जालना, औरंगाबाद, रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा अनेक ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवार नाहीत आणि दुसऱ्या पक्षातून उमेदवार आणण्याची रणनीती देखील नाही

राधाकृष्ण विखे-पाटील हे स्वत:च्या मुलासाठी नगरची जागा सुटावी म्हणून एकीकडे आपली सगळी शक्ती पणाला लावत आहेत, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीकडून आपल्या पत्नीला आपल्या जागी नांदेडमधून उमेदवारी मिळावी म्हणून आपली शक्ती खर्ची घालत आहेत. त्यामुळे निवडणूक तोंडावर येऊनही काँग्रेस मरगळलेल्या अवस्थेत आणि निर्णयक्षमता नसल्याने चाचपडत असल्याचं चित्र आहे