सांगली : राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेलं कोल्हं आहे. या कोल्ह्याला हाकलून लावायचे आहे. हा कोल्हा कारखानादाराच्या मांडीला मांडी लावून नव्हे तर मांडीवर जाऊन बसलाय, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर बोचरी टीका केली.  या कोल्ह्याचा बंदोबस्त या निवडणुकीत आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. म्हणून धैर्यशील माने यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.


VIDEO | सदाभाऊ खोत यांचं गाजलेलं भाषण | कोल्हापूर | माईक टेस्टिंग | एबीपी माझा


हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्लामपूरमध्ये सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम उपस्थित होते.

राहुल गांधीसारखा नालायक माणूस संसदेत पोहोचता कामा नये : उद्धव ठाकरे
राहुल गांधी वीर सावरकरांना भित्रा म्हणतात. सावरकरांना भित्रा म्हणणारा राहुल गांधीसारखा नालायक माणूस संसदेत पोहोचता कामा नये, असे शब्दात एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. सोबतच राजू शेट्टींना मागील वेळेस त्यांना पाठींबा दिला ही माझी चूक होती, असेही ठाकरे म्हणाले.

मागील वेळी चुकीच्या माणसासाठी हातकणंगलेची जागा सोडली होती. पण ती माझी चूक आता तुम्ही जनतेने सुधारायची आहे. गेल्यावेळी नको त्या माणसाला जागा दिली असे म्हणत ठाकरे यांनी शेट्टींवर टीका केली.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी राजू शेट्टींसह शरद पवारांवर टीका केली. राजू शेट्टींना पाडायला भाजप- सेनेची गरज नाही, त्यांना पाडायला शरद पवार पुरेसे आहेत, असे पाटील यावेळी म्हणाले. पवारांनी आतापर्यंत वसंतदादा पाटील, विखेंना फसवले आहे, असे देखील ते म्हणाले.