नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले तर राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील, असे प्रतिपादन काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केले आहे. प्रियांका गांधी यांनी आज राहुल गांधी यांचा मतदार संघ असलेल्या अमेठी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांशी बातचित केली.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, "यंदा राहुल गांधी अमेठीमधून मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकतील आणि देशाचे पंतप्रधान होतील. यावर्षी काँग्रेसला संपूर्ण देशभर प्रचार करायचा आहे. त्यामुळे आम्ही अमेठीत फार कमी वेळ देत आहोत. पक्षाचे सर्व लक्ष पूर्वांचलवर असणार आहे."

प्रियांका म्हणाल्या की, "अमेठी आमचे आणि राहुल गांधींचे घर आहे. इथे राहणारे लोक आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. आम्ही लहानपणापासून अमेठीमध्ये येत आहोत. बाकीचे नेते केवळ चार दिवसांसाठी येथे येतात आणि निवडणुका लढतात. त्यांचे इथल्या लोकांशी कधीही नाते तयार झाले नाही. हे लोक अमेठी रायबरेलीमधील योजना हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात."