जालना : सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागता, त्यापेक्षा एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधींना पाठवायचं होतं दुसऱ्या देशात, मग खरं काय ते तुम्हाला कळलं असतं, अशी टीका महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. विरोधक सातत्याने भारतीय वायु सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून केलेल्या एअऱ स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. यावरुन पंकजा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.


भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालन्यातल्या जामखेड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते, पंकजा मुंडे या सभेला संबोधित करत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, हल्ली कोणीही उठतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी बोलू लागलंय. वर्तमानपत्राची हेडलाईन होण्यासाठी काहीही बोलायला लागले आहेत. आमच्या जिल्ह्यातले लोकल नेते मोदींवर टीका करु लागले आहेत. नरेंद्र मोदी या लोकांना ओळखतदेखील नाहीत, तरिदेखील हे लोक मोदींविषयी बोलतात.

मुंडे म्हणाल्या की, लोकल नेते, कार्यकर्ते मोदींकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. किती लोक गेले? कोण-कोण मेलं? याचा जाब विचारत आहेत. या लोकांचा भारतीय सैन्यावर विश्वास नाही. या प्रश्न विचारणाऱ्यांनाच हेलिकॉप्टरमधून तिथे नेऊन उतरवले पाहिजे, मग त्यांना कळेल कुठे झाला सर्जिकल स्ट्राईक? देशाच्या सुरक्षेवरुन राजकारण केलं जात आहे. या लोकांनी राजकारण अतिशय खालच्या पातळीवर नेलं आहे.