सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात यावेळी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं मोठं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. नारायण राणे यांनी आपले पुत्र निलेश राणे यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.


नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे. तसेच नारायण राणे भाजपचे सहयोगी खासदार आहेत. मात्र असं असतानाही नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी येथून निलेश राणे यांना उमेदवारी दिली आहे.


भाजप-शिवसेनेची युती झाल्याने निलेश राणे यांनी निवडणूक लढवू नये, यासाठी भाजप नेतृत्वाकडून दबाव येत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र माझ्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही. मी पूर्ण विचार करुन निलेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. काहीही झालं तरी निलेश राणे निवडणूक लढणार, उमेदवारी मागे घेणं हे माझं पिंड नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्याने माझ्याशी संवाद साधलेला नाही. तसेच 29 मार्चला निवडणुकीचा फॉर्म भरणार असल्याचंही नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे.



आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी आधीच केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार असल्याची भूमिकाही नारायण राणेंनी आधीच स्पष्ट केलं आहे. निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप गटाला मतदान करणार असल्याचंही नारायण राणेंनी जाहीर केलं होतं.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या निवडणूक निकालाचा इतिहास


राजकीयदृष्या अत्यंत संवेदनशील असा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे  सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ. 2014 साली झालेल्या निवडणुकीचे आकडे आणि यावेळची समीकरणे यात बराच फरक पडला आहे. मात्र 2014 सालच्या  सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत दीड लाखांहून अधिकच्या फरकांनी निवडून आले. त्यावेळी काँग्रेस पक्षात असलेले नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांचा धक्कादायक पराभव झाला होता.




बॅरिस्टर नाथ पै, मुधुदंडवते अशा दिग्गजांचा मतदारसंघ म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ. गडचिरोलीनंतर सर्वात संवेदनशील लोकसभा मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे. रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला हा मतदारसंघ आहे.