नांदेड : 2009 ला आस्तित्वात आलेला नांदेड मधला हा मतदारसंघ. या मतदार संघात 2009 साली कॉंग्रेसकडून ओमप्रकाश पोकर्णा विजयी झाले होते. त्यावेळी शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकांची मते घेतली होती. त्याच हेमंत पाटील यांनी 2014 साली अगदी थोड्या फरकाने ही जागा जिंकली. भाजपच्या दिलीप कंदकुर्ते यांचा पराभव करत हेमंत पाटील विधानसभेत पोहोचले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांनी शेजारच्या हिंगोलीमधून निवडणूक लढवली आणि ते विजयी देखील झाले. त्यामुळे नांदेड दक्षिणमधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील ह्या शिवसेनेच्या उमेदवार असतील असा कयास आहे.


हे ही वाचा -भोकर विधानसभा मतदारसंघ | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपुढे अस्तित्व टिकवण्याचं आव्हान

नांदेड दक्षिण हा मतदारसंघ म्हणजे अर्ध नांदेड शहर, सिडको-हडको आणि सोनखेडचा काही भाग मिळून बनलेला आहे. या मतदारसंघात मुस्लिम, मराठा आणि दलित मतदार निर्णायक संख्येने आहेत. त्यामुळे वंचित आघाडीकडून लढण्यासाठी इथं अनेकजण उत्सुक आहेत. त्यात प्रामुख्याने फिरोज लाला, फारुख अहेमद, मकबुल सलीम, हबीब बावेजा यांचा समावेश आहे. तर सय्यद मोईन हे एमआयएममध्ये पुन्हा येणार असल्याची चर्चा आहे. मोईन जर एमआयएममध्ये आले तर पूर्ण दक्षिण विधानसभा मतदारसंघाच चित्रच बदलू शकते. 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे इथून भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. भाजपकडून संतुक हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, चैतन्य देशमुख, प्रणिता देवरे आदी नाव चर्चेत आहेत. तर कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी अब्दुल सत्तार, अब्दुल शमीम, नरेंद्र चव्हाण यांनीही दावेदारी केली आहे. या मतदारसंघात कायमच सर्वाधिक उमेदवार असतात, त्यामुळे इथली लढाई रंजक असते.

हे ही वाचा -राजापूर मतदारसंघ : शिवसेनेचे राजन साळवी हॅटट्रिक करणार?

शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी द्यावे म्हणून आपल्या काळात आमदार हेमंत पाटील यांनी मोठी मेहनत घेतली. या मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. आताही हिंगोलीचे खासदार झाले तरी ते इकडे लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे शिवसेनेकडूनही जागा हिसकावण्यासाठी विरोधकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. हेमंत पाटील यांनी आपल्या कार्यकाळाची छाप टाकण्याचं काम या मतदारसंघात केलं. मात्र या मतदारसंघातील समस्या अद्यापही कायम आहेत.

नांदेड महानगरपालिका कॉंग्रेसच्या ताब्यात आहे, मात्र नांदेडचे अंतर्गत रस्ते हे एखाद्या खेड्यातील रस्त्यांना लाजवतील असेच आहेत. अपुऱ्या पावसामुळे शहरात पाणी टंचाई आहे. त्याला सर्वस्वी मनपा जवाबदार आहे. पण त्याचा रोष आमदार- खासदारावर जातोय. उद्योग धंद्याच्या बाबतीत नांदेड कपाळकरंटेच आहे. एकेकाळी नांदेडचं वैभव असणारी टेक्सटाईल मिल अद्याप बंदच आहे. इतरही छोटे मोठे उद्योग बंद पडलेले आहेत.

शिक्षणाच्या बाबतीत नांदेड सुधारलं असल तरी इथल्या बेकारांच्या हाथाला कामासाठी पुणे मुंबईच गाठावी लागते. रोज पन्नासहून अधिक खाजगी बसेस पुण्याला ये-जा करतात यावरुन या स्थितीचा अंदाज येईल. इतक्या वर्षात साधी धवलक्रांती ही इथ होऊ शकलेली नाही. साध्या दुधाच्या बाबतीत नांदेडकर सोलापूर, अहमदनगरवर अवलंबून आहेत. पर्यावरण मंत्र्यांकडे नांदेडचं पालकत्व असूनही गोदावरी नदीच प्रदूषण तसूभरही कमी झालेलं नाही. समस्यांचं माहेरघर म्हणजे नांदेड शहर आहे आणि इथले लोक कमालीचे सोशक बनल्यामुळे किमान मतदानातून चमत्कार होईल अशी आशा आहे.

जाणून घ्या या मतदारसंघाविषयी