ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावल्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांची ठाणे बंदचं आवाहन केलं आहे. येत्या 22 ऑगस्टरला ठाण्यातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे 22 ऑगस्टला गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिला आहे.


राज ठाकरे यांना ईडीची नोटीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दादरमधील कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते. मात्र या नोटीसनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

राज ठाकरे यांना 22 तारखेला चौकशीसाठी बोलावलं तर ठाणे बंद करु, असं मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं. तसंच प्रेमाने बंद केलं तर स्वागत नाहीतर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात त्यादिवशी जे घडेल, त्याला सरकार आणि जबाबदार असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कर नाही त्याला डर कशाला? राज ठाकरेंना ईडीच्या नोटीसनंतर मनसे आक्रमक

राज ठाकरेंना ईडीने नोटीस पाठवल्याचं विशेष वाटत नाही : संजय राऊत

काय आहे प्रकरण?

काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत घेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिलं होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.