पुणे : मावळ विधानसभेवर कित्येक वर्षापासून भाजपचा दबदबा आहे. म्हणूनच या मतदारसंघातून संजय उर्फ बाळा भेगडे सलग दोन वेळा आमदार झालेत. याचंच बक्षीस म्हणून उशिरा का होईना त्यांच्या पदरी राज्यमंत्र्यांचा पदभार आला. तरीही 2019 ची विधानसभा निवडणूक ही भेगडेंसाठी आव्हानात्मक असणार आहे. कारण पक्षातूनच अनेकांनी निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्या इच्छुकांना तिकीट नाकारल्यास एकतर ते पक्षविरोधी कारवाया करण्याचे, बंडखोरीचे अथवा दुसऱ्या पक्षाशी घरोबा करण्याचे मनसुबे आखात आहेत. त्यामुळे भेगडेंना आमदारकीची हॅट्रिक साधण्यासाठी पक्षांतर्गत गटबाजीचं आव्हान पेलावं लागणार आहे. तर मावळ लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उतरवले तेव्हा मावळ विधानसभेतील पक्षाची एकमुठ बांधण्यात यश आलं. मात्र विधानसभेपूर्वीच त्यात पुन्हा फूट पडल्याचं चित्र आहे.


सह्याद्रीच्या पर्वत रांगात वसलेला हा मावळ विधानसभा मतदारसंघ. मुंबई-पुण्याला जोडणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग असो की राष्ट्रीय महामार्ग नंबर चार अर्थात जुना पुणे-मुंबई महामार्ग याच मतदार संघातून जातो. लोणावळा, खंडाळा अशी पर्यटन स्थळं.... कार्ला येथील एकविरा देवी, देहूचे संत तुकाराम महाराज, शिरगावचे प्रति शिर्डी, देहूतील धम्म भूमी अशी धार्मिक स्थळं..... छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेले लोहगड, राजमाची, विसापूर असे अनेक किल्ले तर कार्ला लेणी, भाजे लेणी, घोरावडेश्वर लेणी असा ऐतिहासिक ठेवा ही या मतदार संघाला लाभला आहे. पण मतदार संघातील अलीकडचा विकास हा कागदावरच दिसत आहे.


2009 आणि 2014 लोकसभेत युती अर्थात शिवसेनेचे उमेदवार खासदार झाले. युतीचा खासदार दिल्ली दरबारी पाठवण्यासाठी मावळ विधानसभेतील मतदारांनी मोलाचा वाटा उचलला. परिणामी 2009 आणि 2014 च्या विधानसभेतही भाजपच्याच बाजूने मतदार झुकला आणि बाळा भेगडे सलग दोन वेळा आमदारकीच्या खुर्चीवर विराजमान झाले. भेगडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना दोन्ही निवडणुकीत धोबीपछाड केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं याठिकाणी अधिक प्राबल्य आहे. याचा भाजपला नेहमीच फायदा होत आला आहे. म्हणूनच अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने विरोधी पक्षाची दाणदाण उडवली. याला राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत गटबाजी ही कारणीभूत ठरते. उमेदवार आपल्या गटाचा नसेल तर त्याला पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर गट त्या उमेदवाराला पाडण्यासाठी ताकद लावतात. यात ही भाजपचं फावतं.


2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व गट एकनिष्ठ झाले होते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात उतरले. म्हणूनच मावळ विधानसभेतील राष्ट्रवादीच्या सर्व गटांना त्यांचे हेवेदावे बाजूला ठेवण्यापलीकडे काहीच पर्याय उरला नव्हता. पक्षाचे हे गट एकत्र आल्यावर राष्ट्रवादी भाजप अर्थात युतीला सुरुंग लाऊ शकतो, असं बोललं जातं होतं. म्हणूनच येथे पवार कुटुंबीयांनी पक्षाची एकमुठ बांधली, तरीही 21 हजार 827 मतांनी पार्थ पिछाडीवरच राहिले. त्यांना मावळ बंद पाईपलाईन प्रकरणी झालेला गोळीबार ही कारणीभूत ठरला. कारण हा गोळीबार अजित पवार यांच्या आदेशाने झाल्याचा मुद्दा लोकसभेच्या प्रचारात युतीने लाऊन धरला होता. मतदारांना भावनिक करण्यात हा मुद्दा कळीचा ठरल्याचं लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं.


आता 2019 च्या विधानसभेत गोळीबाराचा मुद्दा राष्ट्रवादीला पुन्हा महागात पडू शकतो. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभेपूर्वी पुन्हा फूट पडल्यानं आता येथे त्यांचा उमेदवार कोण हे उमेदवारी अर्ज भरताना ठरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपकडून मावळ नगरपरिषदेचे नगरसेवक सुनील शेळके आणि माजी युवा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी ही जोरदार तयारी केली आहे. शेळकेंनी तर कोट्यवधींचा चुराडा करत यंदा आमदार व्हायचंच असा जणू चंगच बांधलाय. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोठात ही त्यांची यायची तयारी आहे. तसे न झाल्यास अपक्षचा पर्याय ते अवलंबनार असल्याचं बोललं जातंय. पक्षांतर्गत या गटबाजीचा फटका बसू नये म्हणूनच निवडणुकीच्या तीन महिन्याआधी भाजपने भेगडेंना राज्यमंत्री पदी बसवली. राज्यमंत्री पदाच्या रुपाने पक्षाने भेगडेंना ताकद देण्याचं काम केलं आहे. पण केवळ एका अधिवशेषणासाठी भेगडेंना मिळालेलं हे पद नावापुढे लावण्यापुरतंच कामी येईल असं दिसत आहे. भेगडेंची राज्य मंत्रिपदी वर्णी लागल्यानं आता भाजपचे तेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र भेगडेंना आमदारकीची हॅट्रिक साधायची असेल तर त्यांना विरोधकांसह पक्षांतर्गत गटबाजीचं आव्हान पेलावं लागणार आहे.


मावळ लोकसभा 2019 ला मावळ विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मतं


श्रीरंग बारणे (शिवसेना) - 1 लाख 5 हजार 272 (विजयी)
पार्थ अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस ) - 83 हजार 445