वाशिम : महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर वाशिम विधानसभा मतदारसंघ 1962 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीकरिता खुल्या प्रवर्गासाठी होता. पहिल्याच  निवडणुकीत या मतदारसंघाचं नेतृत्व कॉंग्रेसचे रामराव झनक यांनी केले. या मतदारसंघावर कॉंग्रेसचा पहिला झेंडा फडकवला तो 30 वर्षांपर्यंत कायम  राहिला. मात्र हा मतदारसंघ 1967 साली अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला. तेव्हापासून हा मतदारसंघ आजपर्यंत कायम एससी प्रवर्गासाठी राखीवच आहे. कॉंग्रेसने या मतदारसंघावर सलग 30 वर्ष आपला झेंडा कायम फडकावला.


1990 पर्यंत कॉंग्रेसकडे असलेल्या या गडाला खऱ्या अर्थाने सुरुंग लागला तो 1990 मध्ये. राजकारणाचा लवलेश नसताना भाजपकडून लखन मलिक यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आणि कॉंग्रेसचे आमदार भीमराव कांबळे यांचा 3907 मतांनी पराभव झाला. यानंतर भाजपने सलग तीन वेळा वाशिम विधानसभामतदार संघावर आपला झेंडा कायम ठेवला. या मतदारसंघावर भाजपची पकड 1990 पासून 2004 कायम होती. इथे निवडून आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी न मिळाल्याने विकासाचा चेहरा म्हणून नवीन उमेदवारांकडे सातत्याने पहिलं जायचं.

मात्र दहा वर्ष राजकारणापासून अलिप्त असलेले लखन मलिक 2004 च्या निवडणुकीत सक्रीय झाले. भाजप पुन्हा उमेदवारीची संधी देईल, या आशेने त्यांनी मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने काम सुरु केलं आणि भाजपकडे उमेदवारी मागितली. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारत नवखा चेहरा मोतीराम तुपसांडे यांना उमेदवारी दिली. याच गोष्टीचा राग मनात ठेवून मलिक यांनी भाजपाशी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मलिक यांचं अपक्ष निवडणूक लढवणं हे भाजपाचा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात जाण्याचं कारण ठरलं.

2004 च्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मतं
1. सुरेश इंगळे (कॉंग्रेस) - 42,131
2. मोतीराम तुपसांडे (भाजप) - 32, 859
3. लखन सहदेव मलिक (अपक्ष) - 23, 641

भाजपने 2004 मध्ये केलेली चूक 2009 मध्ये न परवडणारी असल्यामुळे भाजपने मलिक यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यावेळी लखन मलिक यांचा 24,229 मतांनी विजय झाला. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अलका मकासरे यांना 40, 945 मतं मिळाली तर भाजपच्या लखन मलिक यांना 65174 मतं मिळाली आणि या मतदारसंघाची नो रिपीटची परंपरा मोडत मलिक पुन्हा आमदार झाले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपामुळे भाजपा शिवसेनेची युती तुटली आणि दोन्ही पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली. या निवडणुकीतही भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करुन या मतदारसंघावर भाजपचा झेंडा कायम ठेवला.

2014 वाशिम विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांना मिळालेलं एकूण मतदान  
लखन मलिक (भाजप) - 48,196
शशिकांत पेंढारकर (शिवसेना) - 43, 803
लखन मलिक यांचा 4, 393 मतांनी विजयी झाले.

एकूणच भाजप विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकारची कामं करत असला तरी या मतदारसंघाची विकासापासून कायमच उपेक्षा राहिली. त्याचं कारण म्हणजे सर्वात कमी शिक्षण असलेले राज्यातील एकमेव आमदार म्हणून लखन मलिक यांची ओळख आहे आणि ते या मतदारसंघाचा विकास फार काही न करु शकले नाही, असं मतदारांचं म्हणणं आहे. आता सुशिक्षित आमदार जो विकासाच्या दृष्टीने काम करेल त्यालाच मतदारराजा कौल देणार असल्याचं चित्र आहे.

2019 च्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार हे आतापासून स्पष्ट होत आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी उमेदवारची भलीमोठी यादी आहे. राहुल तुपसांडे, करुणा कल्ले, श्याम खोडे, विवेक माने, नागेश घोपे, संगीता इंगोले, मधुकर कांबळे, वसंत धाडवे  यांनी मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या असल्या, तरी विद्यमान आमदार लखन मलिक संघाशी एकनिष्ठ असून नागपूरसोबत थेट कनेक्शन असल्याने मलिक यांनाच तिकीट मिळू शकतं, असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे. तर शिवसेनेचे शशिकांत पेंढारकर, राजा भैया पवार यांनीही मतदारसंघामध्ये मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. शशिकांत पेंढारकर यांना पक्षाकडून तिकीट मिळो अथवा न मिळो, मात्र निवडणूक लढवणार असल्याचं कळतं. तर कॉंग्रेसकडून जवळपास 20 उमेदवाराची यादी आहे, ज्यात माजी आमदार सुरेश इंगळे आणि समाधान माने याचं नाव पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर समोर येत आहे. परंतु मात्र काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी पक्षासाठी मारक ठरु शकते. या सगळ्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे ती वंचित बहुजन आघाडीची. वंचितकडून विजय मनवर हे उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी मतदारसंघात त्या पद्धतीने चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळणारं मतदान खऱ्या अर्थाने निर्णायक ठरु शकतं.