सोनभद्रमधील उंभा या गावात प्रियांका गांधी आल्या होत्या. त्यावेळी एबीपीच्या प्रतिनिधींनी त्यांना कलम 370 च्या संदर्भात प्रश्न विचारला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्याने सदर प्रतिनिधीला 'तुला समजत नाही का. इथंच ठोकून देईल. मारलं तर पडून जाशील' असं म्हणत प्रियांका यांच्यासमोरच धक्का मारला. यावेळी प्रियांका यांच्या समोर धक्काबुक्की करण्यात आली असतानाही त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. संदीप सिंह असे या काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे.
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्याच्या उंभा जमिनीवरून दोन समाजामध्ये मोठा वाद झाला. यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. प्रियांका या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना 370 विषयी प्रश्न विचारला असता पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली.
यावर कॅबिनेट मंत्री सतीश महाना यांनी हा प्रकार लोकशाही विरोधी असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचं मानसिक संतुलन गमावलं आहे. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान या घटनेनंतर पत्रकार संघ देखील आक्रमक झाला असून उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांकडे या घटनेची तक्रार केली आहे. संदीप सिंह विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.