सोनभद्र : उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये प्रियांका गांधींना 370 रद्द केल्याच्या निर्णयावर प्रश्न विचारणाऱ्या एबीपी गंगाच्या पत्रकाराला काँग्रेस कार्यकर्त्याने धक्काबुक्की केली. इतकंच नाही तर पत्रकाराला कार्यकर्त्यांनी धमकावलं देखील आहे. 370 चा प्रश्न विचारण्यासाठी भाजपकडून पैसे घेतले असल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्ते एबीपीच्या पत्रकाराच्या अंगावार आले. दरम्यान 370 कलम रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाही विरोधात असल्याची प्रतिक्रिया प्रियांका गांधींनी दिली मात्र त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला मारहाण केली.


सोनभद्रमधील उंभा या गावात प्रियांका गांधी आल्या होत्या. त्यावेळी एबीपीच्या प्रतिनिधींनी त्यांना कलम 370 च्या संदर्भात प्रश्न विचारला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्याने सदर प्रतिनिधीला 'तुला समजत नाही का. इथंच ठोकून देईल. मारलं तर पडून जाशील' असं म्हणत प्रियांका यांच्यासमोरच धक्का मारला. यावेळी प्रियांका यांच्या समोर धक्काबुक्की करण्यात आली असतानाही त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. संदीप सिंह असे या काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे.

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्याच्या उंभा जमिनीवरून दोन समाजामध्ये  मोठा वाद झाला. यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. प्रियांका या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना 370 विषयी प्रश्न विचारला असता पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली.

यावर कॅबिनेट मंत्री सतीश महाना यांनी हा प्रकार लोकशाही विरोधी असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचं मानसिक संतुलन गमावलं आहे. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान या घटनेनंतर पत्रकार संघ देखील आक्रमक झाला असून उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांकडे या घटनेची तक्रार केली आहे. संदीप सिंह विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.