रत्नागिरीत डोंगराला 10 ते 12 फूट खोल आणि 10 ते 15 फूट रुंद भेगा, गावकरी भयभीत
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2019 10:39 AM (IST)
डोंगराला सुमारे 10 ते 12 फूट खोल आणि 10 ते 15 फूट रुंद भेगा पडल्या आहेत. त्यामुळे एक हजार लोकवस्ती असलेल्या भडवले गावाला धोका निर्माण झाला आहे. या गावाचे माळीण होण्याच्या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
NEXT PREV
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील भडवले गावाशेजारील डोंगराचं भूस्खलन होऊन भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. डोंगर खचण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे शिंदेवाडी, देऊळवाडी, बौद्धवाडी इथल्या कुटुंबाना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु स्थलांतरित कुठे व्हायचे, हा प्रश्न कायम आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण असून भेगा कशामुळे पडतात याचा शोध घेण्यासाठी भूगर्भ संशोधन होणे गरजेचे असल्याचं म्हटलं जात आहे. डोंगराला सुमारे 10 ते 12 फूट खोल आणि 10 ते 15 फूट रुंद भेगा पडल्या आहेत. त्यामुळे एक हजार लोकवस्ती असलेल्या भडवले गावाला धोका निर्माण झाला आहे. या गावाचे माळीण होण्याच्या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. रात्र जागून काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु सरकारकडून कोणतीही पाऊले उचलले जात नसल्याने भडवले गावचे माळीण होण्याची सरकार वाट पाहतंय का असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. भूस्खलनामुळे या गावातील रस्ते उखडले आहेत. डोंगरावरील भली मोठी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. या डोंगरावर सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर भूस्थलन होऊन भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. डोंगरावर ठिकठिकाणी जमीन दलदल झाली आहे. त्यामुळे बागायती, भातशेतीकडे जाता येत नाही. शाळेला धोका असल्याने शाळा सुद्धा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत, परंतु कुठे स्थलांतरित व्हायचे?, वयोवृद्ध माणसांनी कुठे जायचे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.