नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पक्षाची 184 उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या जागी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देत अडवाणींचा पत्ता कट केला आहे.


VIDEO | अडवाणींना वाढत्या वयामुळे तिकीट दिलं नाही : नितीन गडकरी | नवी दिल्ली | एबीपी माझा



मात्र अडवाणींचे तिकीट कापले नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. अडवाणी यांचे तिकीट कापलेलं नाही, तर त्यांचे वाढते वय आणि तब्येतीच्या कारणांमुळे संसदीय बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.  अडवाणी आमचे प्रेरणास्थान आहेत, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

अटलजी आणि आडवाणी आमचे प्रेरणास्रोत आहेत. कोणत्याही पक्षात परिवर्तन होते. याचा अर्थ तिकीट कारल्याचा संबंध त्यांच्या योगदानाही होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल पक्षातील प्रत्येकाच्या मनात सन्मान आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी गडकरी म्हणाले की, नागपुरातून यावेळी 4 लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकू, नागपुरात आम्ही खूप कामं  केली आहेत. मी नागपुरात वैयक्तिकरित्या 50 हजार लोकांना ओळखतो, असेही ते म्हणाले.

भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा समावेश आहे. मोदी वाराणसीतून तर अमित शाह गांधीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान याआधी  लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरमधून लढत होते. त्यामुळं अमित शाहांच्या उमेदवारीनं अडवाणींचा पत्ता कापला गेला आहे.
1998 पासून गांधीनगर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आडवाणी यांच्याऐवजी भाजपाने राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी दिली. त्यामुळे 91 वर्षीय आडवाणी यांना भाजपनं सक्तीची निवृत्ती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरु झाली आहे.

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा

भाजपची 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा यामध्ये करण्यात आली असून 14 विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

भाजप महाराष्ट्रात 25 जागा लढवणार आहे. भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. लातूरमध्ये सुधाकरराव शृंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाकीच्या 14 जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार

नंदुरबार - हीना गावित
धुळे -  सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला - संजय धोत्रे
वर्धा - रामदास तडस
नागपूर - नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुर - अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना - रावसाहेब दानवे
भिवंडी - कपिल पाटील
मुंबई उत्तर - गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन
अहमदनगर - सुजय विखे पाटील
बीड - डॉ. प्रीतम मुंडे
लातूर - सुधाकरराव शृंगारे
सांगली - संजयकाका पाटील

भाजप मुंबईतील सहापैकी तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र किरीट सोमय्या खासदार असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघ वगळता इतर जागांवरील उमेदवारांची घोषणा झाली. शिवसेनेकडून सोमय्यांच्या नावाला विरोध असल्यामुळे सोमय्यांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे.

सोलापुरात सुशीलकुमार शिंदे, बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोणते उमेदवार द्यायचे, याबाबत अद्याप भाजपचा निर्णय झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडून माढ्याचा तिढा सुटत नसल्यामुळे भाजप त्याठिकाणीही आस्ते कदम घेताना दिसत आहे.

भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या 'या' जागांचे उमेदवार अद्याप घोषित नाहीत

ईशान्य मुंबई - किरीट सोमय्या
दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण
सोलापूर - शरद बनसोडे
जळगाव - अशोक पाटील

भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. सुजय विखे यांच्या भाजपप्रवेशानंतर नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणं निश्चित मानलं जात होतं. तर लातूरमधून विद्यमान खासदार सुनील गायकवाडांनाही दुसरी संधी नाकारली आहे. लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे वडवळ-नागनाथ गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांच्या ते जवळचे मानले जातात.

देशभरातील महत्त्वाचे उमेदवार

वाराणसी - नरेंद्र मोदी

लखनौ - राजनाथ सिंह

नागपूर - नितीन गडकरी

गांधीनगर - अमित शाह

बागपत - डॉ सत्यपाल सिंह

गाजियाबाद - वीके सिंह

गौतम बुद्ध नगर - महेश शर्मा

मथुरा- हेमा मालिनी

अमेठी - स्मृती इरानी

उत्तर कन्नड - अनंत कुमार हेगडे

उन्नाव - साक्षी महाराज

अरुणाचल पूर्व - किरेन रीजीजू

आसनसोल- बाबुल सुप्रियो