मुंबई : पहिल्या टप्प्यातील मतदानाने लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी आज झालं. पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी सातपासून सुरु झालेलं मतदान संध्याकाळी सात वाजता संपलं. यंदा मतदानाची वेळ दीड तासांनी वाढवली होती.


राज्यातल्या सात मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.78 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. वर्ध्यात 55.36 टक्के मतदान झालं, रामटेक इथे 51.72 टक्के, नागपूर इथे 53 टक्के, भंडारा गोंदिया इथे 60.50 टक्के, गडचिरोली-चिमूरमध्ये 61 .33 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के, तर यवतमाळ-वाशिम येथे 53.97 टक्के मतदान झालं. भर उन्हातही मतदार उत्साहाने घराबाहेर पडले आणि मतदानाचा हक्क बजवला. तर नक्षलवाद्यांच्या हैदोसानंतरही गडचिरोलीत सर्वाधिक मतदान झाल्याचं पाहायलं मिळतं.

2014 मधील विदर्भातील मतदान
वर्धा 64.79 टक्के, रामटेक 62.64 टक्के, नागपूर 57.12 टक्के, भंडारा-गोंदिया 72.31 टक्के, गडचिरोली 70.04 टक्के, चंद्रपूर 63.29 टक्के, यवतमाळ-वाशिम -58.87 टक्के

नितीन गडकरी, माणिकराव ठाकरे, हंसराज अहिर, नाना पटोले यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 116 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झालं आहे. चार जागांवर भाजप आणि काँग्रेसचा थेट सामना होणार आहे, तर दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना भिडणार आहेत.


विदर्भातील मतदारसंघनिहाय आढावा


मतदारसंघ : वर्धा

वर्धा जिल्ह्यातील चार आणि अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ मिळून वर्धा लोकसभा मतदारसंघ होतो. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या वर्ध्यात गेल्या काही वर्षात विद्यमान खासदाराला पुन्हा संधी मिळाली नाही.

तापमान 43 अंश सेल्सिअस

पारा वाढलेला असतानाही वर्ध्यात ग्रामीण भागात मतदार आपलं कर्तव्य पार पडायला बाहेर निघाले. अनेक ठिकाणी मतदानासाठी विशेषतः महिला मतदारांनी रांगा लावल्या

मतदान झालं 61.18 टक्के


लढत : रामदास तडस आणि चारुलता टोकस याची प्रतिष्ठा पणाला

विद्यमान खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या दिवंगत नेत्या प्रभा राव यांनी कन्या चारुलता टोकस यांच्या लढत आहे. 2014 मध्ये मोदी लाटेत वर्ध्यात ऐतिहासिक मतदान म्हणजे 64.79% मतदान झालं होतं. 2019 मध्ये तीव्र उन्हात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं. वर्धा मतदारसंघातील जातीय समीकरण आणि ग्रामीण भागातील वाढलेले मतदान ठरवेल यावेळी कोण उमेदवार जिंकून येईल.

VIDEO | वर्ध्यात अशा प्रकारे पार पडलं मतदान | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



-------------

मतदारसंघ : रामटेक

मोठा भौगोलिक विस्तार असलेला आणि नेहमीच राजकीय दृष्टीने धक्कादायक निकाल देणाऱ्या रामटेक मतदारसंघातही आज मतदान पार पडलं

तापमान 41 अंश सेल्सिअस

तीव्र उन्हातही रामटेकच्या ग्रामीण भागात मतदार आपलं कर्तव्य पार पडायला बाहेर निघाले. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा केंद्राच्या बाहेर दिसल्या,

मतदान झालं 62.12 टक्के


लढत : कृपाल तुमाने आणि किशोर गजभिये यांची प्रतिष्ठा पणाला

एक विद्यमान खासदार तर दुसरे काही महिन्यापूर्वीच काँग्रेसमध्ये आलेले माजी सनदी अधिकारी यांच्यात रंगली ही लढत. प्रस्थापितांना राजकीय धक्के देऊन नवख्याना संधी देण्यासाठी ओळखले जाणारे रामटेकचे मतदार यावेळी पुन्हा शिवसेनेच्या बाजूने कौल देतात की काँग्रेसला संधी देणार हे 23 मे रोजीच स्पष्ट होईल.

VIDEO | रामटेक मतदारसंघात काय घडलं? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



-------------

मतदारसंघ : नागपूर

नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ मिळून नागपूर हे संपूर्णपणे शहरी लोकसभा मतदारसंघ होतो. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नागपुरात गेल्या काही वर्षात भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. महापालिका, सहाही विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार आणि नितीन गडकरी यांच्या स्वरुपात भक्कम खासदार. नागपुरात गडकरी यांच्यापूर्वी विलास मुत्तेमवार यांच्या स्वरुपात चार वेळा सलग काँग्रेसचं खासदारकीवर वर्चस्व होते. मात्र गडकरी यांनी गेल्या वेळी ते वर्चस्व तोडले. भाजपला विश्वास आहे की यावेळीही त्यांचंच वर्चस्व कायम राहिल. तर काँग्रेस आपले जुने दिवस पुन्हा मिळवण्यासाठी उत्सुक आहे.

तापमान 43 अंश सेल्सिअस

नागपूरचा पारा वाढलेला असतानाही नागपूरात सर्वत्र मतदार आपलं कर्तव्य पार पाडायला घराबाहेर निघाले. अनेक ठिकाणी तर मतदानासाठी विशेषतः महिला मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. खासकरुन मुस्लीमबहुल मोमीनपुरा भागात तर महिलांचा भर दुपारी मतदानाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

मतदान झालं 53.13 टक्के (दुपारी 5 पर्यंत)

लढत : नितीन गडकरी आणि नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला

विद्यमान खासदार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात लढत आहे. 2014 मध्ये मोदी लाटेत आणि परिवर्तनाच्या हवेत नागपुरात 57.08% मतदान झालं होतं. 2019 मध्ये तीव्र उन्हातही शहरी आणि सुशिक्षित मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान करायला बाहेर पडले.

VIDEO | वर्ध्यात अशा प्रकारे पार पडलं मतदान | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



-------------

मतदारसंघ : भंडारा-गोंदिया  

ज्या नरेंद्र मोदींच्या सत्तेचा सूर्य कधी मावळणार नाही, असं भाजप समर्थकांना वाटत असताना त्याच भंडारा-गोंदिया जिल्ह्याने विरोधकांना पहिला आशेचा किरण दाखवला. आज याच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदान पार पडलं.

तापमान 42 अंश सेल्सिअस

राज्यात गोंदिया-भांडाऱ्यात तापमानाचा पारा रेकॉर्ड ब्रेक नोंद होत असला तरी मतदानाची टक्केवारी ही तोडीस तोड असते. 2014 मध्ये मतदानाची टक्केवारी सत्तरी पार गेली होती. यंदा उन्हाच्या तडाख्यात हा रेकॉर्ड तुटतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल.

मतदान झालं  60.50 टक्के (दुपारी 5 वाजेपर्यंत)

लढत : नाना पंचबुद्धे आणि सुनील मेंढे यांची प्रतिष्ठा पणाला

2014 मध्ये नाना पटोले यांच्याकडून पराभव झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पोटनिवडणुकीत ही जागा भाजपकडून पुन्हा खेचून आणली. नाना यांचं भाजपमधलं बंड पटेल यांच्या फायद्याचं ठरलं. मात्र यंदा प्रफुल्ल पटेल स्वतः रिंगणात उतरले नसले तरी ही निवडणूक त्यांचं राजकीय अस्तित्व ठरवणारी नक्कीच ठरेल.
-------------

मतदारसंघ : गडचिरोली-चिमूर

नक्षलवादाची झळ सोसणारा गडचिरोली-चिमूर हा लोकसभा मतदारसंघ अनुसचित जमातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात या मतदारसंघाचे राजकारण केंद्रीत आहे. या लोकसभा मतदार गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, अहेरी या तीन, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ब्रह्मपुरी या दोन, तर गोंदियातील आमगाव या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

तापमान 42 अंश सेल्सिअस

एकीकडे सूर्य आग ओकत होता तर दुसरीकडे नक्षलवाद्यांचा हैदोस सुरु होता. सुरुवातीला भूसुरुंग स्फोट, पोलिसांसोबत चकमक आणि मग सी60 कमांडो पथकावर हल्ला, मतदानाच्या वेळात नक्षलवाद्यांनी कुरापती सुरुच होत्या. काही निवडणूक कर्मचारी केंद्रांवर पोहोचू शकले नाहीत. तरीही दुपारी पाच वाजेपर्यंत विदर्भातील सात मतदारसंघा पैकी सर्वाधिक मतदान गडचिरोली-चिमूरमध्ये झालं.

मतदान झालं 69 टक्के


लढत : अशोक नेते आणि नामदेव उसेंडी यांची प्रतिष्ठा पणाला

भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेतेंनी 2014 च्या निवडणुकीत गडचिरोली-चिमूर ही जागा जिंकून डॉ. नामदेव उसेंडींना हरवलं होतं. त्यामुळे भाजपच्या हातातून ही जागा खेचून आणण्याचा उसेंडींचा प्रयत्न असेल, यात वाद नाही. वंचित बहुजन आघाडीकडून चिमूरचे माजी आमदार रमेश गजबे रिंगणात आहेत. माना समाजाची या भागात लक्षणीय मतसंख्या आहे.

-------------

मतदारसंघ : चंद्रपूर

कोळशाच्या खाणींचा जिल्हा चंद्रपूर...राज्याला वीज पुरवणारा जिल्हा चंद्रपूर... तेलंगणापासून मराठवाड्यापर्यंत विस्तीर्ण असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात जातीच्या राजकारणाला कधीही थारा दिला नाही. मात्र हाच मुद्दा पुढे करुन चंद्रपूर लोकसभेची निवडणूक पार पडली.

तापमान 43 अंश सेल्सिअस

अतिशय कडक ऊन असूनही मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. विशेष म्हणजे सकाळपेक्षा दुपारीच लोक मोठ्या प्रमाणात रांगा लावून उभं असल्याचे चित्र पाहायला मिळालं. चंद्रपूरचे आजचं तापमान होतं तब्बल 44 अंश सेल्सिअस..

मतदान झालं 55.97 टक्के

लढत : बाळू धानोरकर आणि हंसराज अहिर यांची प्रतिष्ठा पणाला

पाचव्यांदा संसदेची पायरी चढायला सज्ज झालेले भाजपचे हंसराज अहिर आणि मूळ शिवसेनावासीय बाळू धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली. बाळू धानोरकर आणि हंसराज आहिर यांच्यातील लढाई वैयक्तिक स्वरुपाची जास्त होती. मोदी सरकार च्या काळात विकास झाला की नाही, असा निवडणुकीचा वरकरणी रंग असला तरी जातीय प्रचार आणि उमेदवाराची वैयक्तिक छबी यावरच निवडणुकीच्या काळात सर्वात जास्त भर देण्यात आला. उमेदवारांच्या या प्रचाराला मतदारराजाने काय प्रतिसाद दिला आहे हे आता ईव्हीएममध्ये बंद झाला आहे.

-------------

मतदारसंघ : यवतमाळ-वाशिम

कापसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडलं.

तापमान 42 अंश सेल्सिअस

उन्हाचा कडाका वाढताच सकाळी अकरानंतर मतदारांची संख्या घटत गेली. मात्र पाच वाजल्यानंतर नागरिक पुन्हा मतदानासाठी घराबाहेर पडले. सात वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.

मतदान झालं 61.09 टक्के


लढत : माणिकराव ठाकरे, भावना गवळी आणि वैशाली येडे

गेल्या वेळच्या तुलनेत यंदा यवतमाळमध्ये मतदानाचा टक्का थोड्याफार प्रमाणात वाढलेला दिसून आला. दुपारी 5 पर्यंत 53 टक्के मतदान झालं होतं. एकंदरीतच या तिघांमध्ये लढत रंगली असून मतदारराजा कोणाला कौल देतो, कोणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकतो हे 23 मे लाच स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :

Lok Sabha Election LIVE UPDATE | विदर्भातील सात जागांसह देशभरात 91 मतदारसंघांमध्ये मतदान



विदर्भातील रंगतदार लढती, पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांचा आढावा

राज्यात 3 लाखांहून अधिक दिव्यांग मतदार, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

माओवाद्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या इशाऱ्यानंतर गडचिरोली-चिमुर मतदार संघात अतिरिक्त पोलीस बल तैनात

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे, त्या सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?

'या' कारणामुळे मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली

पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान