मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांमध्ये येत्या गुरुवारी म्हणजेच 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. देशभरातील 13 राज्यांमधल्या एकूण 97 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.


दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात दिग्गज नेत्यांकडून दिवसभर शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सोलापूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील अमरावती येथील युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली.

महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यात विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जागांचा समावेश आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर या मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघांच्या प्रचारतोफा आज संध्याकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. याआधी युती, आघाडीच्या उमेदवारांकडून अंतिम टप्प्यात सर्वसामान्यांच्या भेटी, सभांचा जोर वाढलेला आहे. गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील.

दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती

अकोल्यात तिरंगी सामना

अकोल्यात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रेंना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2014 मधील निवडणुकीत धोत्रेंनी हिदायत पटेल यांना पराभवाची धूळ चारली होती, त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी पटेल उत्सुक असतील. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर अशा दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदाही अकोल्यातील लढत तिरंगी होणार आहे. अकोल्यात गेल्या वेळी प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी होते.

सोलापुरातही तिहेरी लढत

भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट करत डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नाही-नाही म्हणताना काँग्रेसकडून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची शिंदेंना संधी आहे. मात्र आंबेडकरांचं आव्हान तगडं ठरल्यास सोलापुरातही तिहेरी लढत होणार.

अमरावतीत पुन्हा अडसूळ विरुद्ध नवनीत राणा

शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पुन्हा निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. नवनीत राणा आपल्या 'युवा स्वाभिमान पार्टी'कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र त्यांना महाआघाडीचा पाठिंबा आहे. त्यामुळे 2014 मधील हायव्होल्टेज ड्रामाची पुनरावृत्ती होणार, हे निश्चित.
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील 10 जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?

नांदेडमधून काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकमेव खासदार

गेल्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे अवघे दोन खासदार निवडून आले होते. दोघंही जण यंदा पुन्हा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यास अनुत्सुक होते. अखेर त्यापैकी एक असलेले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. तेही ना'राजी'नाम्याचं नाट्य झाल्यानंतर. खरं तर नांदेड हा अशोक चव्हाणांचा पारंपरिक मतदारसंघ. मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या प्रताप पाटील चिखलीकराची टक्कर त्यांना असेल. त्यामुळे काँग्रेसच्या एकमेव खासदाराला आपली जागा टिकवण्याचं आव्हान आहे.

विद्यमान खासदाराला 'बाद' करणारा उस्मानाबाद

उस्मानाबादेतून शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांना बाद करत ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकमेकांचे हडवैरी मानल्या जाणाऱ्या दोन भावांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर 2014 साली राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा दारुण पराभव केला होता.

बीडचा सोपा गड

बीडचा गड भाजपसाठी तुलनेने सोपा मानला जातो. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.

बुलडाण्यातून शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे रिंगणात आहेत.

मराठवाड्यात चित्र काय?

परभणीतूनही शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर मैदानात उतरले आहेत. लातूरमध्ये भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करत सुधाकरराव शिंगारे यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसने मच्छिंद्र कामंत यांना उतरवलं आहे. हिंगोलीतील काँग्रेसचे खासदार राजीव लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्यामुळे पक्षाने सुभाष वानखेडेंना उमेदवारी दिली. तर हेमंत पाटील यांना शिवसेनेने तिकीट दिलं आहे.

पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या विदर्भातील सात मतदारसंघांसह देशभरात 91 ठिकाणी मतदान पार पडलं होतं.

दुसरा टप्प्यात कोणत्या राज्यात किती मतदारसंघ (97)

आसाम - 5
बिहार - 5
छत्तीसगड - 3
जम्मू काश्मिर - 2
कर्नाटक - 14
महाराष्ट्र - 10
मणिपूर - 1
ओदिशा - 5
तामिळनाडू - 39 (सर्व)
त्रिपुरा - 1
उत्तर प्रदेश - 8
पश्चिम बंगाल - 3
पुदुच्चेरी - 1
संबंधित बातम्या :

Loksabha Election 2019 : चौथ्या टप्प्यामधील लढतींचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी चुरस

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कोणकोणत्या प्रमुख लढती?

विदर्भातील रंगतदार लढती, पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांचा आढावा

शिवसेनेचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' उमेदवारांना भिडणार

गडकरी वि. पटोले, पूनम महाजन वि. प्रिया दत्त, महाराष्ट्रातील बिग फाईट्स

लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी