मुंबई: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागांवर यश मिळणार, याची संपूर्ण मदार पाच राज्यांवर अवलंबून आहे. या पाच राज्यांमध्ये भाजपला (BJP) किती यश मिळते, यावर पुढील गणितं अवलंबून असतील, असे मत राज्यशास्त्राचे प्राध्यापक सुहास पळशीकर (Suhas Palshikar) यांनी व्यक्त केले. सुहास पळशीकर यांना एबीपीच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात यंदाच्या लोकसभा निवडणुकीविषयीची (Lok Sabha Election 2024) अनेक रंजक निरीक्षणे सांगितली.


यंदा खूप लोक भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसेल, असे बोलत आहेत. निवडणुकीत काहीही होऊ शकते. पण मला स्वत:ला भाजपला फार मोठा फटका बसेल, असे वाटत नसल्याचे मत सुहास पळशीकर यांनी व्यक्त केले. देशातील एक मोठा मतदार वर्ग नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हा मतदार एखाद्या दुबळ्या उमेदवाराला किंवा विरोधी पक्षातून भाजपमध्ये आलेल्या आजपर्यंतच्या विरोधकालाही मत द्यायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल 2014 मध्ये एका वर्गात निर्माण झालेले आकर्षण अजून संपलेले नाही, ते वाढत नसेल, सॅच्युरेशनच्या पातळीला पोहोचले असेल पण ते आकर्षण अजूनही शिल्लक आहे, असे निरीक्षण सुहास पळशीकर यांनी नोंदवले.


भाजपसाठी पाच राज्यांमधील निकाल महत्त्वाचा


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 2014 आणि 2019 सारखा उत्साह दिसत नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही तो उत्साह नाही. त्यामुळे भाजपच्या जागा वाढणं अवघड दिसत आहे, असे सुहास पळशीकर यांनी म्हटले. उत्तर प्रदेशात 2019 साली भाजपला 60 जागा मिळाल्या होत्या. 1998 पासून उत्तर प्रदेशात भाजपची ज्याप्रकारची ताकद आहे,  ते पाहता भाजपला साधारण परिस्थितीत 45 ते 50 जागांवर विजय मिळू शकतात. पण 2019 च्या भाजपच्या जागांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत या जागा घटतात का, ही भाजपसाठी चिंतेची गोष्ट आहे. 


महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार या पाच राज्यांमध्ये काय घडतंय, यावर मोठे आकडे बदलणार आहेत. या पाच राज्यातील कामगिरीवर भाजपच्या एकूण यशापयशाचे गणित अवलंबून असेल, असे सुहास पळशीकर यांनी सांगितले. 


भाजपचा प्लस पॉईंट काय?


भाजपच्या एकूण मतांची संख्या 2014 ते 2019 या काळात सहा टक्क्यांनी वाढली. ही परिस्थिती लक्षात घेतली तर गेल्या 25 -30 वर्षात इतक्या वेगाने मतं वाढून ती स्थिरावणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. ही भाजपची मोठी कमाई आहे. 2019 मध्ये भाजपकडे एकूण 37 टक्के मतदार होते. यापैकी काहीजण 2019 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भाजपकडे तात्पुरते आकर्षित झाले, असे मानले तरी हा टक्का मोठा आहे. आताच्या घडीला भाजपकडे 30 टक्के मते असतील आणि हे प्रमाण भाजप 40 टक्क्यांपर्यंत कशी न्यायची, हे भाजपसमोरील आव्हान आहे. त्यासाठी भाजप केरळ, तामिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांमध्ये स्वत:च्या मतांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे सुहास पळशीकर यांनी सांगितले. 


आणखी वाचा


महाराष्ट्राची हवा कुणाच्या बाजूने? देशात कुणाची सत्ता? राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांचे 'माझा कट्टा'वर बेधडक विश्लेषण