मुंबई : पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारांचे अर्ज भरुन झाले, तरी शिवसेना-भाजपच्या ईशान्य मुंबईतील उमेदवारीचा सस्पेन्स काही संपत नाही. 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमध्ये रात्री पार पडलेल्या बैठकीतही किरीट सोमय्यांच्या उमेदवारीवर ठोस निर्णय झाला नाही.


किरीट सोमय्यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याचे चान्सेस फिफ्टी-फिफ्टी असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेत सोमय्यांविषयी नाराजी आहे. त्यामुळेच किरीट सोमय्या यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किरीट सोमय्यांनी केलेली टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत : राहुल शेवाळे

'किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अनेकदा अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. शिवसैनिक सोमय्या यांनी केलेली टीका विसरलेले नाहीत. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघात किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.' असं शिवसेना खासदार राहुल शेवाळे म्हणाले होते.

दुसरीकडे, प्रवीण छेडा यांचीही काँग्रेसमधून भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. त्यामुळे प्रवीण छेडा हे किरीट सोमय्या यांना लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय असल्याचीही जोरदार चर्चा आहे. सोमय्यांच्या डोक्यावरील उमेदवारीची तलवार
टांगतीच आहे.