मीनागंडी : काँग्रेस नेते राहुल गांधी हे 'टूरिस्ट पॉलिटिशन' आहेत, ज्यांनी अमेठीचे 15 वर्षे नेतृत्व केलं आणि आता ते वायनाडला आले आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. काँग्रेस आणि गांधी परिवारासाठी लोक केवळ व्होट बॅंक आणि सत्ता केवळ धन बॅंक आहे असेही ते म्हणाले. ते केरळ येथील मीनागंडी या ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी एकत्र येऊन आता नवा पक्ष तयार करावा आणि त्याचं नाव हे कॉम्रेड काँग्रेस पार्टी ठेवावं."


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना अमित शाह म्हणाले की, "केरळमधील वायनाड हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे. त्यांनी त्या आधी अमेठीचे 15 वर्षे प्रतिनिधित्व केले, त्या ठिकाणी कोणताही बदल झाला नाही. आता ते वायनाड येथे आले आहेत. ते एक पर्यटक आहेत. ते कधी अमेठीत जातात तर कधी वायनाडमध्ये. त्यामुळे त्यांच्याकडून विकासाची काही अपेक्षा करू नका."


युपीएचे सरकार दहा वर्षे सत्तेत होतं. लोकांनी विकास करण्यासाठी त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी जवळपास 12 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यामुळे काँग्रेस आणि गांधी परिवारासाठी लोक केवळ व्होट बॅंक आहे आणि सत्ता धन बॅंक आहे अशी टीका अमित शाह यांनी केली.


केरळमधील वायनाडच्या मीनागंडी येथे अमित शाह यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की जर या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडूण आला तर वायनाड जिल्हा हा देशातील सर्वात प्रगतीशील जिल्हा बनवू.



महत्वाच्या बातम्या :