वाशीम जिल्ह्यातील कारंजा ही ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेली नगरी आहे. दत्तगुरुचे जन्मस्थान असलेल्या गुरु मंदिराने कारंजाची देशभरात ओळख आहे. पुरातन श्रीमंत  बाजार पेठही कारंज्यात आहे. कारंजा विधानसभा मतदार संघ राजकीयदृष्ट्या जिल्ह्यातील महत्वाचा मतदार संघ मानला जातो.  या मतदार संघाचा इतिहास थोडा वेगळाच आहे.  या मतदार संघाची निर्मिती १९७८ मध्ये झाली. त्या वेळेस वाशीम जिल्हा हा अकोल्यात समाविष्ट होता. त्यामुळे या मतदार संघामध्ये मुर्तीजापूर तालुक्यातील ५२ गावाचा समावेश होता.

या मतदार संघामध्ये एक अपवाद  वगळता आतापर्यंत कारंजा मतदार संघाबाहेरील उमेदवार आमदार म्हणून  निवडून येत आहेत.  २००९ च्या निवडणुकीत कारंज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार प्रकाश डहाके हे पहिले स्थानिक आमदार म्हणून निवडून आले आणि मतदार संघाची अनिवासी उमेदवाराला आमदार बनविण्याचा इतिहास बदलला.

मतदार संघाच्या इतिहासावर नजर टाकली तर १९७८ मध्ये  पहिला आमदार बनण्याचा मान अखिल भारतीय फारवर्ड ब्लॉकचे अरविंद कमलाकर देशमुख यांना मिळाला मात्र त्या नंतर आणीबाणी लागली आणि  दोन वर्षानंतर परत निवडणुका झाल्या आणि त्यानंतर या मतदारसंघामध्ये  १९८० ते  १९९०  पर्यंत  इथे सलग दोन वेळा कॉंग्रेसने झेंडा फडकावला.

१९९० च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या गुलाबराव गावंडेंनी कॉंग्रेसच्या विजयरथाला थांबवलं. मात्र शिवसेनेला हा गड जास्त काळ टिकवता आला नाही आणि १९९५ च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस बंडखोर बाबासाहेब धाबेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत लिंकली.  बाबासाहेब धाबेकर यांना १९९५ मध्ये पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली. १९९५ च्या युती सरकारमध्ये बाबासाहेब धाबेकर अपक्षांच्या कोट्यातून परिवहन राज्यमंत्री झाले.

मात्र मंत्रीपदाचा मोह न ठेवता १९९९ च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब धाबेकर यांनी परत कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला आणि कारंज्याचे आमदार म्हणून निवडून आले. २००४ च्या निवडणुकीमध्ये  बाबासाहेब धाबेकर यांचा  प्रभाव कमी झाला. २००४ ची निवडणूक शिवसेनेच्या राजेंद्र पाटणी यांनी जिंकली. त्यांनी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार प्रकाश डहाके यांचा अवघ्या ४७ मतांनी पराभव केला.

२००९ ला विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाली. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूरची ५२ गावे या मतदारसंघातून वगळली गेली. त्याऐवजी वाशीम जिल्ह्यातील कारंजा आणि मनोरा अशा दोन तालुक्यांचा कारंजा विधानसभा मतदार संघ तयार झाला. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव असलेल्या दिलीप वळसे पाटील यांचे मेहुणे असलेले प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली. कारंजा मतदारसंघात स्थानिक उमेदवाराच्या मुद्यावर निवडणूक लढवीत प्रकाश डहाके यांनी निवडणूक जिंकली. प्रकाश डहाके हे कारंज्याचे पहिले स्थानिक आमदार ठरले. त्यांनी शिवसेनेच्या राजेंद्र पाटणी यांचा पराभव केला.


 २००९ मध्ये  शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांचा पराभव झाला आणि  या पराभवासाठी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी जवाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पक्षाने राजेंद्र पाटणी यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप ठेवत पक्षातून हकालपट्टी केली. हकालपट्टीनंतरही राजेंद्र पाटणी राजकारणामध्ये शांत बसले नाहीत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून जिंकली. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे सुभाष ठाकरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे होते.  सुभाष ठाकरे मंगरूळपीर मतदारसंघाचे तीन वेळा आमदार होते. त्यांना मंगरुळपीरऐवजी कारंज्यातून उमेदवारी मिळाली. प्रकाश डहाके यांच्या ऐवजी सुभाष ठाकरे यांना उमेदवारी देण्याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला. प्रकाश डहाके यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. प्रकाश डहाके यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीचे सुभाष ठाकरे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. भारिप-बहुजन महासंघाचे युसूफ पंजानी दुसऱ्या क्रमांकावर राहिले. राजेंद्र पटणी यांनी भाजप आमदाराच्या रुपाने कारंज्यात कमळ फुलवलं.

२०१९ ची परिस्थिती आणखी वेगळी आहे. कारंजा मतदारसंघ शिवसेना-भाजपच्या पारंपरिक जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला जातो. २०१४ मध्ये पक्षाने उमेदवारी न दिल्याने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत कारंजा मतदारसंघामध्ये २०१९ मध्ये उमेदवारीच्या शब्दावर शिवबंधन बांधून प्रकाश डहाके शिवसेनेत दाखल झाले. त्यांनी आपल्या मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात कामे ही सुरु केली. त्यांनाच उमेदवारी मिळणार असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.

शिवसेनेकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. खा. भावना गवळी आणि संजय राठोड यांच्या मधील वाद जगजाहीर आहे. त्यामुळे बंजारा समाजाचं मतदान या मतदार संघामध्ये अधिक असल्याचा फायदा घेत संजय राठोड हे बंजारा समाजाचा प्रतिनिधी बनण्यासाठी उत्सुक आहेत. तर भावना गवळी यांच्या माध्यमातून प्रकाश डहाके यांना उमेदवारीसाठीचा आग्रह धरल्या जाणार आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन गट असून गवळी आणि राठोड या दोन गटांमध्ये उमेदवारी मिळवण्यावरुन मोठी रस्सीखेच होणार आहे.

भाजपने २०१४ च्या निवडणुकीमध्ये ही जागा जिंकल्यामुळे भाजपचे राजेंद्र पाटणी जिंकलेली जागा सोडण्यासाठी तयार नाहीत. राजेंद्र पाटणी यांना उमेदवारी मिळणार का, अशीही एक चर्चा आहे.

माजी आमदार गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनिल राठोड,  माजी खासदार आणि विद्यमान विधान परिषद आमदार हरिभाऊ राठोड आणि बाबासाहेब धाबेकर यांचे  चिरंजीव सुनील धाबेकर हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वाशीम  जिल्हापरिषद उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे  जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार  सुभाष ठाकरे यांचे पुत्र चंद्रकांत ठाकरे इच्छुक आहेत. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची चर्चाही मतदारसंघात आहे. चंद्रकांत ठाकरे यांचा जनसंपर्क ही जमेची बाजू आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी ऐन निवडणुकाच्या तोंडावर राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव यांना वंचित बहुजनने जिल्हाध्यक्ष बनवल्याने पुंजानी नाराज आहेत. युसुफ पुंजानी यांनी कारंजा नगरपालिकेत सत्ता खेचून आणली तर मंगरूळपीर, वाशीम आणि रिसोड नगरपालिकेत पक्षाचे अनेक नगरसेवक निवडून आणले. तरीही पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी युसूफ पुंजानी यांना विश्वासात न घेता उमेदवारांची  चाचपणी सुरु केल्याने नाराज पुंजानी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची मतदार संघातली घडी विस्कटल्याची चर्चा आहे. निवासी अनिवासीच्या मुद्यावर निवडणूक झाल्यास प्रकाश डहाके यांचा मार्ग सुकर होणार आहे.