कोलकाता : देशभरातील सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान आतापर्यंत अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधानं करुन वाद ओढवून घेतले आहेत. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी)आमदार रत्ना घोष यांनी सुरक्षाबलाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. घोष म्हणाल्या की, निवडणुकीच्या कामासाठी तैनात केलेल्या जवानांना कोणीही घाबरु नये, जर काही झाले तर त्यांच्यावर हल्ला करा


कार्यकर्त्यांना रत्ना घोष म्हणाल्या की, जर तुम्हाला युद्ध जिंकायचं असेल तर काय बरोबर, काय चूक याचा विचार करत बसू नका. लोकशाहीच्या मार्गाने अथवा त्याच्या विरोधात जाऊन आपल्याला जिंकावच लागेल. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला जिंकावच लागले. मी 2016 मध्ये पाहिले आहे की, सुरक्षाबलातील जवान आमच्या मुलांना (कार्यकर्त्यांना)मारतात. निवडणुकांमध्ये मोठ्याप्रमाणात रक्तपात होतो. यावर्षीची निवडणूक ही अधिकच आव्हानात्मक आहे. परंतु घाबरण्याची गरज नाही.

रत्ना घोष यांच्या कार्यकर्त्यांची डोकी भडकवणाऱ्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे बोलले जात आहे. एबीपीने अद्याप या व्हिडीओला दुजोरा दिलेला नाही.