मुंबई : महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये गेले 3-4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे देशभरात आतापर्यंत 35 जणांनी प्राण गमावले आहेत. राजस्थानमध्ये  9 जण मृत्युमुखी पडले आहेत, तर मध्य प्रदेशात पावसाने 15 जणांचा बळी घेतला आहे. तसेच दिल्लीत एक, बिहारमध्ये एक आणि गुजरातमध्ये 9 जण दगावले आहेत. पावसामुळे दिल्लीत एक आणि बिहारमध्ये एक जण दगावला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये हवामान खात्याने वादळाचा अलर्ट जारी केला आहे.


मंगळवारी मध्य प्रदेशमध्ये सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि वीज पडल्यामुळे 15 जण दगावले. तसेच कित्येक लोक जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केले आहे, तसेच पीडितांना संपूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

VIDEO | वादळी पावसामुळे देशभरात 35 लोकांचा मृत्यू | एबीपी माझा



कमलनाथ म्हणाले की, वीज पडल्यामुळे इंदूर, धार जिल्हात तसेच अन्य ठिकाणी जीवितहाणी तसेच अत्यंत दुःखदायी घटना घडल्या आहेत. पीडित परिवारांप्रती मी शोक व्यक्त करतो. माझे सरकार अशा मुश्कीलप्रसंगी या सर्व पीडित परिवारांच्या सोबत आहे.


राजस्थानमध्येदेखील अवकाळी पावसामुळे 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 लोक जखमी झाले आहेत. राज्यातील झालावाड जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. तसेच जयपूर, हनुमानगड, अलवर, राजसमंद आणि उदयपूरमध्ये 1-1 व्यक्ती दगावली आहे.