घाटकोपर पश्चिम मुंबई उपनगरातील विधानसभा मतदारसंघ आहे. मराठी बहुल मतदार असलेल्या या मतदारसंघाचे विद्यामान आमदार मनसेतून भाजपात येऊन रुळलेले राम कदम हे आहेत. घाटकोपर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ लोकसभेला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात जातो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत. दोन लाख 62 हजार मतदार असलेल्या या मतदार संघात तब्बल दीड लाख मराठी मतदार आहेत.

2009 साली घाटकोपर पश्चिम मधून मनसेच्या तिकिटावर विद्यमान आमदार राम कदम निवडणून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळवून एकतर्फी विजय मिळविला होता. त्यानंतर 2014 साली राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 ची निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर जिंकली आहे. त्यावेळेस देखील त्यांनी 80343 इतक्या बहुमताने विजय मिळविला होता. परंतु गेल्या काही वर्षात त्यांचा विधानसभा क्षेत्रातील विकास कामांचा उतरता आलेख आणि बेताल वक्तव्य यामुळे नागरिकांमध्येच नाही तर पक्षांतर्गत देखील नाराजी आहे. त्यात भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण छेडा देखील भाजपमधून या विधानसभा निवडणुकीतुन लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर मनसेकडून विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल हे या मतदार संघातून निवडणुकीस उभे राहू शकतात. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीकडे मात्र तुल्यबळ उमेदवारच नसल्याचं चित्र आहे.

घाटकोपर पश्चिम विधानसभेचा इतिहास
2009 सालापासून या मतदार संघात विद्यमान आमदार राम कदम हे आमदार आहेत. विद्यमान खासदार आणि भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांना 2009 च्या निवडणुकीत राम कदम यांनी हरवले होते. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातला  2009 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा मतदार आता भाजप आणि शिवसेनेकडे वळला आहे. त्यातच काँग्रेस राष्ट्रवादीची मतदार संख्या ही कमालीची रोडावली आहे. त्यात आमदार राम कदम यांना मानणारा त्यांचा वैयक्तीक मतदार ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भाजपने जर पुन्हा त्यांना उमेदवारी दिली तर ते मोठा विजय ते मिळवू शकतात. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारलं तर संभाव्य लढत आमदार राम कदम आणि भाजपच्या उमेदवारातच होईल.

आताचं राजकारण

2009 साली राम कदम यांनी 60343 इतकी मते मनसेत असताना घेतली होती. 2014 मध्ये त्यात वाढ होऊन राम कदम यांना 80343 मते मिळाली. म्हणजे पाच वर्षात जवळपास 20 हजार मतदार त्यांनी वाढवले आहेत. त्याचवेळी राम कदमांनी मनसे सोडल्यानंतर मनसेतील काही नेते-कार्यकर्ते शिवसेनेत गेले तर राष्ट्रवादीतूनही काहीजण शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे घाटकोपरमधील शिवसेनेची ताकदही वाढली आहे. या मतदार संघात शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीत भाजप - शिवसेना एकत्र लढली आणि आमदार राम कदम यांनाच पुन्हा तिकीट मिळालं तर त्याचं मताधिक्य आणखी वाढू शकतं. पण तसं झालं नाही तर घाटकोपर पश्चिम मध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल.