अहमदनगर : अहमदनगरमधील भाजपच्या प्रचारसभेत भाषण करताना रोखल्यानं भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी संतापले. यावेळी त्यांनी आयोजकांवर नाराजी व्यक्त करत भाषण सुरुच ठेवलं. यावेळी मागील 5 वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडताना दिलीप गांधी भावूक झाले. शेवटी भाषणात दिलीप गांधींनी सुजय विखेंचं नाव न घेता मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं.


VIDEO | भाषण थांबवण्यास सांगितल्यावर खासदार दिलीप गांधींचा संताप | अहमदनगर | एबीपी माझा



अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेच्या सुरुवातीला गांधी बोलायला उभे राहिले असताना त्यांना भाषण आवरतं घेण्यासाठी सांगितलं गेलं. यावेळी ते चांगलेच भडकले.

दरम्यान याच सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र खासदार दिलीप गांधी यांच्या कामाचं कौतुक केलं. खासदार दिलीप गांधींनी चांगलं काम केलं. तुम्हाला विसरणार नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, गांधी यांनी चांगलं काम केलं मात्र कधी कधी सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो.  सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर तो सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असे फडणवीस म्हणाले.

शरद पवारांना आता काय झालंय काही समजत नाही :  मोदी 

देशाच्या नावावर काँग्रेस पक्षाची साथ सोडणाऱ्या शरद पवारांना आता काय झालंय काही समजत नाही. देशात दोन पंतप्रधान आणायची भाषा करत काँग्रेसवाले काश्मीरला तोडण्याची भाषा करत आहेत. असं असताना शरदराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहून तुम्हाला झोप कशी लागते, या अशा शब्दात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी मोदी म्हणाले की, काँग्रेसचे नेते काश्मीरला वेगळं करायचं म्हणणात. मात्र शरद पवारांना काय झालंय? तुम्ही देशाच्या नावावर काँग्रेस सोडली. आता दोन पंतप्रधान होणार यावर तुम्ही गप्प का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

ज्या काश्मीरसाठी देशातील हजारो सैनिकांनी बलिदान दिलं ते काश्मीर सोडायचे का? असे म्हणत तुम्हीदेखील विदेशी चष्म्यातून बघायला लागलात काय अशी टीका मोदींनी पवारांवर केली. तुम्ही राष्ट्रवादी असं तुमच्या पक्षाचे नाव ठेवलंय, मात्र भूमिका शोभणारी नाही.  शरदराव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर राहात असून तुम्हाला झोप कशी येतेय? असा सवालही मोदींनी यावेळी केला.

अहमदनगरच्या सभेत देखील मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. 'शिर्डी साईबाबाच्या सानिध्यात असलेल्या या नगरीला माझे नमन. महाराष्ट्र आणि अहमदनगरच्या सर्व बांधवाना उद्याच्या रामनवमीच्या खूप शुभेच्छा' अशा शब्दात मोदींनी सुरुवातीला शुभेच्छा दिल्या.

यावेळी मोदी म्हणाले की, 5 वर्षांपूर्वी इथं आलो होतो, त्यावेळी कमी लोक होती, मात्र आज दुपटीपेक्षा जास्त लोक आहेत. तुमच्या या प्रेमाला आणि या विश्वासाला मी नमन करतो. तुम्ही एवढ्या उन्हात इथं येत माझ्यावरील कर्ज वाढवलं आहे असं मोदी यावेळी म्हणाले.

आज जग भारताला महाशक्ती म्हणून ओळखत आहे. तुम्ही देशाचा निर्णय घ्यायला निघाला आहात. आता देशात इमानदार चौकीदार चालणार आहे की भ्रष्टाचारी नामदार चालणार आहे हे तुम्ही ठरवायचं आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.