मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मित्रपक्षांची एकही जागा न देता बोळवण करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्र्यांसोबत रासपचे महादेव जानकर, रिपाइंचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची बैठक पार पडली. यावेळी विधानसभेसाठी मित्रपक्षांनी लोकसभेच्या जागांवर पाणी सोडल्याचं स्पष्ट झालं आहे.


राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल बारामतीतून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. महादेव जानकरांना डावलून हा निर्णय घेतल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काही वेळात जानकरांनी नाराजी दूर झालेली पाहायला मिळाली होती. मात्र कांचन कुल यांची भाजपच्या चिन्हावरील उमेदवारी मान्य केली असल्याचंही महादेव जानकरांनी बैठकीनंतर सांगितलं.


>

कांचन कुल आजपासून भाजपमध्ये असतील. युतीतील मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्या प्रचाराला जाणार असल्याची माहिती महादेव जानकरांनी दिली. लोकसभा निवडणुकीत नाही, मात्र विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळतील. घटकपक्षांवर अन्याय होणार नाही, योग्य तो सन्मान आणि भागीदारी दिली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.






मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून उद्या कोल्हापूरमधील प्रचारसभेच्या महामेळाव्यात घटकपक्षही उपस्थित असतील, अशी माहिती महादेव जानकर यांनी बैठकीनंतर दिली आहे.


सर्व घटकपक्ष एकजुटीने काम करतील आणि महायुती आणखी भक्कम करतील. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकदिलाने काम करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि सर्व नेत्यांचे आभारही मानले.