सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. ही याचिका 6 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती. 11 विविध राज्यांमधील 11 विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचं करिअर आपण संकटात टाकत आहोत असं म्हटलं आहे. खंडपीठाने यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं असल्याची नोंद घेतली. धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही, असंही यावेळी न्यायालयाने सांगितलं. न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी परीक्षा झाली नाही तर देशाचं नुकसान होणार नाही का? असा सवाल विचारत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल असं म्हटलं.
परीक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती प्रत्येक काळजी घेतली जाईल, असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयाला सांगितलं.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 जुलै रोजी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. हे प्रसिद्धी पत्रक रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. देशभरात कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच जेईई आणि नीट परीक्षांचे आयोजन करण्यास केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या काळात परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्यासारखे आहे, त्यामुळे या काळात परीक्षांचे आयोजन करू नये अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI