Wardha Crime : नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात 35 दिवसांपूर्वी आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचं रहस्य उलगडण्यात वर्धा पोलिसांना (Wardha Police) यश आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर नजीकच्या सातेफळ इथल्या जंगलात आरोपींना शोधण्यात आलं. अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या (Murder) केली असल्याची बाब समोर आली आहे. तर आधी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, त्यानंतर ओळख पटू नये यासाठी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 


नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव श्यामजी पंत इथल्या सत्याग्रही घाटात 35 दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्याचं आणि तिच्या मृत्युचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं होतं. वर्धाच नाही तर इतर जिल्ह्यातील बेपत्ता महिलांचा सोटोजन पोर्टलवरुन शोध घेतल्यावर या घटनेतील आरोपीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने तिची हत्या केली. तसंच ओळख पटू नये यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाण्याचा प्रयत्न केल. तब्बल चाळीस दिवसानंतर उलगडलेल्या हत्येच्या रहस्यात यवतमाळच्या नेर परसोपंत इथला आरोपी पती मनीष भोसले आणि त्याचा साथीदार प्रवीण पवार यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महिलेचा पती आणि त्याच्या साथीदाराला अटक


मागील वर्षी 10 डिसेंबरला नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटापासून काही अंतरावर जंगलात एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. भीमराव शिंगारे नावाच्या व्यक्तीने मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली होती. या प्रकरणाची वर्ध्यातील तळेगाव (श्यामजीपंत) पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मृतदेह सापडल्यानंतर पुढील 35 दिवसांच्या तपासानंतर वर्धा पोलिसांनी हत्येची उकल केली आहे. 


वर्ध्याचे पोलीस अधीक्षक (Wardha SP) नुरुल हसन यांनी काल (15 जानेवारी) पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले की, "मृतदेह पूर्णपणे जळालेला होता, केवळ तिचे दागिने, जळलेली साडी आणि चप्पलांच्या आधारे ओळख पटवणं हे आव्हानात्मक होतं. ज्योत्स्ना भोसले असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेचा पती मनिष भोसले आणि त्याचा साथीदार प्रवीण पवार यांना (रा.मंगरुळ चव्हाळा, नांदगाव (खंडेश्वर) अमरावती) अटक केली आहे." दरम्यान, या दोघांना 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


आरोपीचा शोध कसा घेतला?


"एक महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी वर्धा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा, पांढरकवडा, मुलताई, अथनेर आणि बैतुल इथून बेपत्ता झालेल्या 3,000 हून अधिक महिलांचा शोध घेतला. याशिवाय पोलिसांनी दागिने, चप्पल विक्रेते, कापड विक्रेते आणि टेलर्स यांची चौकशी केली. घटनास्थळाजवळील 25 ते 30 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुरे चारणारे, महामार्गावरील पेट्रोल पंप कर्मचारी, हॉटेल, पंक्चर दुरुस्तीची दुकाने यांचीही चौकशी करण्यात आली. इतकंच नाही तर ऊस तोडणीत सहभागी असलेल्या सुमारे 1200 ते 1500 महिलांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. सायबर सेलने सर्व तांत्रिक बाबी तपासल्या असताना 2,000 महिलांची चौकशी करण्यासाठी आशा वर्कर्सनाही सहभागी करुन घेण्यात आलं. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी 5 डिसेंबर रोजी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती, त्यावरुन तपासाला वेग आला. ज्योत्सनाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मनिषला होता. या संशयातूनच त्याने प्रवीण पवार या साथीदाराच्या मदतीने तिची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाची नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावरुन केवळ चप्पल, साडीचे काही तुकडे आणि दागिने एवढ्याच वस्तू गोळा करण्यात आला. मृतदेह जळाला होता," असं पोलीस अधीक्षक नुरुल हसल यांनी सांगितलं.


हेही वाचा


अंधश्रद्धेचा कळस! पैशांचा पाऊस पाडण्याचं सांगत वर्ध्यात युवतीचा अघोरी छळ