कल्याण : कल्याण ग्रामीण भागात घरफोड्या करणाऱ्या एका भाजी विक्रेत्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. बबन जाधव असे या चोरट्याचे नाव असून तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. बबन इगतपुरी नाशिक येथून शेतकऱ्यांकडून भाजी आणून कल्याणात विकायचा. मिळालेला पैसा त्याने ऐशो आरामासाठी उधळला. आता शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसल्याने त्याने घरफोडीचा मार्ग अवलंबला. पुढे ती त्याची सवयच बनली. मात्र, एका घरफोडी दरम्यान सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने या भाजी विक्रेत्याचे बिंग फुटले व तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Continues below advertisement


बबन जाधव असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. तो इगतपुरी मधील गोंदेदुमाला मधील रहिवासी आहे. मानपाडा पोलिसांनी त्याच्याकडून पावणे सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याने चार घरफोड्याची कबुली दिली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तसेच आठवडी बाजारात नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचा विक्रीसाठी तयार असलेला माल गोळा करून बबन घेऊन येत असे. मालाची विक्री झाल्यानतर पैसे देण्याचे आश्वासन देत तो शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा. मात्र, कल्याणात या भाजीची विक्री करून मिळालेले पैसे त्याने ऐशोआरामासाठी उडवले. आता शेतकऱ्यांना पैसे कसे द्यायचे या विचारात त्याला पैसे कमावण्याचा चोरीचा सोपा मार्ग सापडला.


..अन् त्याला चोरीची सवय लागली
कल्याणच्या ग्रामीण भागात फिरून त्याने बंद घरे हेरली. अडीवली ढोकळी मधील राजाराम पाटील यांच्या घरातून त्याने 4 लाख 54 हजार रुपये किमतीचे दागिने लांबवले. तर आणखी तीन घरफोड्यामध्ये मिळून त्याने 6 लाख 75 हजाराचे दागिने चोरले होते. यातून त्याला चोरीची सवय जडली होती. राजाराम पाटील यांच्या घरात चोरी करताना तो सीसीटीव्हीत कैद झाला अखेर पेट्रोलिंग दरम्यान त्याची ओळख पटवून मानपाडा पोलीसानी त्याला बेड्या ठोकल्या.


संबंधीत बातमी :
पेणमधील चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार : गृह राज्यमंत्री


नागपुरात टवाळखोर गावगुंडांची दादागिरी, निर्दोष आजोबा-नातावाचा बळी