रायगड: एका व्यक्तीने मित्राच्याच दहा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उरणमधून समोर आली आहे. उरण तालुक्यातील चिर्ले गावात राहणाऱ्या बिंदू राम अजोर (वय 33) यांनी मोठ्या विश्वासाने आपल्या मुलाला शेजारीच राहणाऱ्या कांताराम सिताराम यादव याच्यासोबत घरी पाठवलं. मात्र, पुढे जे घडलं, ते अतिशय भयानक होतं.


उरण तालुक्यातील चिर्ले गावात बिंदू राम अजोर  (वर्ष 33) हे गृहस्थ पत्नी आणि आपल्या एकुलत्या एक दहा वर्षे वयाच्या हर्षसह तेथील मढवी यांच्या चाळीत भाड्याने राहत होते. पत्नी गावी गेल्यावर मुलगा आणि वडील घरी एकटेच राहत होते. बिंदू हे वाहनचालक असल्याने त्यांच्या घरी येण्याच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या ते कोणत्याही वेळी घरी परतायचे. ते कामासाठी बाहेर पडल्यावर घरात मुलगा एकटाच राहत असल्याने वडिलांना काळजी लागून राहायची याच अनुषंगाने त्यांनी आपला मुलगा  बिंदू याला मंगळवारी आपल्या मुलाला सोबतच घेऊन कामावर निघाले.


वाहनातून मालाची डिलिव्हरी करण्यासाठी ग्लोबल लॉजिस्टिक्स टर्मिनलमध्ये लहान मुलाला प्रवेश देण्यास तेथील सुरक्षा रक्षकांनी नकार दिला. यामुळे मुलाला कुठे ठेवायचे या विवंचनेत असतानाच बिंदू यांनी त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या कांताराम सिताराम यादव त्याठिकाणी आलेला दिसताच त्यांनी हर्षला त्यांच्याकडे सोपवले.  यानंतर त्यांनी हर्ष घरी पोहचला की नाही हे तपासण्यासाठी फोन केला मात्र संपर्क होत नसल्याने त्यांनी शेवटी आपले घर गाठले.  मात्र घरी ना मुलगा सापडला ना कांताराम यामुळे बिंदू राम यांनी कांताराम व मुलाचा रात्रभर परिसरात शोध घेतला. दोघांचाही ठावठिकाणा लागला नाही.


जुन्या भांडणाचा राग काढला दहा वर्षाच्या चिमुरड्यावर


सकाळी उरण परिसरातील खोपटा-पोगोटे रिलायन्स या कोस्टल रोड वरील खाडीत येथील एका सुरक्षा रक्षकाला हर्ष याचा मृतदेह आढळून आला. त्यांनी वेळ न घालवता तत्काळ उरण पोलिसांना यांसदर्भातील माहिती दिली.  खबर मिळताच उरण पोलीस पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. खाडीत धारदार शस्त्राने हर्ष याचा गळा चिरून हत्या करून टाकलेले मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने संशयित आरोपी कांतारामला पलायनाच्या तयारीत असतानाच  ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच जुन्या भांडणाचा राग मनात धरून हर्षची आपण  हत्या केली असल्याची कबुली आरोपी कांतराम यांनी दिली.


निष्पाप जीवाची गळा चिरून हत्या


दरम्यान घरी पोहचविण्यासाठी मोठ्या विश्वासाने ओळखीच्या मित्राकडे सोपविलेले. मात्र दहा वर्षीय निष्पाप हर्ष बिंदू यादव यांचे अपहरण करून निष्पाप जीवाची गळा चिरून हत्या केली. मित्रांनेच एकुलत्या एक असलेल्या मित्राच्या मुलांची गळा चिरून हत्येच्या दुदैवी प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास उरण येथील  पोलीस यंत्रणा करत आहेत. 


हे ही वाचा :


सुतगिरणीतील मजुराचा प्रेयसीनेच काटा काढला, बेपत्ता प्रियकराचा मृतदेह तलाव परिसरात सापडला