Navi Mumbai Crime News : जेवणाच्या पैशावरून  झालेल्या भांडणात 17 जणांकडून  तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हल्ला करण्यात आलेले 17 आरोपी सद्या फरार आहेत. तर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दोन्ही परिवार हे ऐकमेकांचे नातेवाईक असून कामोठे गावात राहणारे आहेत. 


संदीप म्हात्रे, प्रवीण म्हात्रे,  निलेश म्हात्रे , विजय म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे , जयवर्धने म्हात्रे,  संजय म्हात्रे , महेश  म्हत्रे , प्रभाकर म्हात्रे , आणि अनोळखी सात व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार हेमंत म्हात्रे आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून कामोठे सेक्टर 14 येथे राहतात. त्यांच्या घराजवळच त्यांचे दोन काका आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असून 26 मार्च रोजी सर्व म्हात्रे व नजीकचे नातेवाईक मिळून 150 जण जेजुरी येथे गेले होते. त्या ठिकाणी खर्चावरून त्यांचे तेथेच  भांडण झाले.    


मात्र घरातील मोठ्या व्यक्तींनी वाद मिटवला. 31 मार्च रोजी सर्व बसून आपसात चर्चा करून प्रकरण मिटवू असे ठरले. त्याप्रमाणे दर्शन करून सर्वजण कामोठे येथे आलेही.  मात्र 29 तारखेला रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून फिर्यादी व पुतण्या प्रशांत म्हात्रे घराखालील एका बाकावर बसून क्रिकेटचा सामना मोबाईलवर पाहत होते.  त्यावेळी अचानक सर्व आरोपी हजर झाले. त्यांच्या कडे लोखंडी गज , लाकडाचे बांबू होते. आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केली. हे भांडण सोडवण्यास आलेले हिरामण म्हात्रे , गोमुबाई म्हात्रे यांनाही मारहाण झाली.  आरोपींनी शेवटी दगडाने फिर्यादीच्या गाड्यांच्या काचाही फोडल्या. सध्या फिर्यादी व त्यांच्या पुतण्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान अद्याप पर्यंत १७ आरोपी फरार आहेत.