Nagpur Crime News : कुटुंबातील किरकोळ वादातून आपल्याच जावयाची निर्घृण हत्या (Crime News) करणाऱ्या मारेकरी मेहुण्याला अखेर अटक करण्यात आली आहे. शिवीगाळ केल्यामुळे रागाच्या भरात (Nagpur Crime) त्याच्या हातून हे कृत्य घडल्याचे या प्रकरणातील संशयित आरोपी अरुण अन्नू बनवारी  (24, रा. गोरेघाट, ता. लिंगा, जि. छिंदवाडा-मध्यप्रदेश) कबूल केले आहे. ही घटना बेलतरोडी पोलिस (Nagpur Police)ठाण्याच्या हद्दीत सोमवार 11 मार्चला रात्रीच्या सुमारास घडली होती. त्यानंतर यातील मारेकरी अरुण हा तेव्हापासून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत आरोपीचा शोध घेतला असता त्याला मंगळवारच्या रात्री कळमना येथून अटक करण्यात आली आहे.


कौटुंबिक किरकोळ वादातून केली होती हत्या


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मृत रवी गलीचंद कहार (30, रा. तिनसई, छिंदवाडा, मध्यप्रदेश) आणि अरुण बनवारी हे दोघेही मध्यप्रदेशातील रहिवासी असून गेल्या महिन्याभरापूर्वी ते कामाच्या शोधात नागपूरात आले होते. हे दोघेही नात्याने जावई आणि मेहुणे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कामाच्या शोधत असताना त्यांना बेलतारोडी परिसरात एका निर्वाधीन इमारतीच्या  बांधकाम स्थळी नाली खोदण्याचे काम मिळाले. गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या कुटुंबियांच्या सोबत याच कामाच्या स्थळी झोपडी करून राहत होते. काही दिवसांअगोदर त्याचा लहान भाऊ श्याम आणि जावई अंकित हे बैद्यनाथ चौकातील साइटवर कामासाठी गेले आणि तेथेच राहायला लागले, तर पत्नी निशा ही दोन आठवड्यांअगोदर महाशिवरात्रीसाठी गावाला गेली. त्यामुळे रवी आणि अरुण हे दोघेच कच्च्या घरात राहत होते.


दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये काही कौटुंबिक कारणावरून वाद झाला आणि थोड्या वेळात त्यांचा हा शाब्दिक वाद हाणामारीत रूपांतरित झाला. त्यात चिडलेल्या अरुणने रवी याच्यावर काठीने जोरदार हल्ला केला. यात रवीला जबर मार बसल्यामुळे तो अल्पावधीतच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर भयभीत झालेल्या अरुण त्याला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पळ काढला. अशातच वेळेत उपचार न मिळाल्याने रवी याचा जागीच मृत्यू झाला. 


मारेकरी मेहुण्याला कळमण्यातून अटक 


त्यानंतर या प्रकरणाची माहिती बेलतारोडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत अरुणने घटनास्थळावरुन पळ काढला होता. त्यानंतर श्याम कहार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत संशयित आरोपी असलेल्या अरुणचा शोध सुरू केला होता. या हत्येच्या घटनेची पुढील चौकशी करण्यासाठी बेलतारोडी पोलिसांनी एक पथक छिंदवाड्यासाठी रवाना केले होते. तर स्थानिक पोलीस ठाण्याचे तीन पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत असतांना यातील संशयित आरोपी पोलिसांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास कळमना येथे आढळून आला. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याची ओळख पटली आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेची पुढील चौकाशी सध्या पोलीस करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या