Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. 


या प्रकरणी आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं होतं की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते.


मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती.. 32 वर्षीय महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार, अत्याचारानंतर अमानुषपणे मारहाण


आम्हाला माफ कर ताई - चित्रा वाघ


पीडितेच्या मृत्यूचं वृत्त कळल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. 
पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणं देणं नाही. त्यांच्यासाठी तुझा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना. नाही वाचवू शकलो तुला, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल म्हटलं होतं की, एका आरोपीला आता अटक केली आहे. पण मला खात्री आहे की यात आणखी नावं समोर येतील. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांची बोटं छाटली जात आहेत, कुठं एफआयआर नोंदवली जात नाही. गणरायानं या सरकारला सद्बुद्धी द्यावी, महिला आणि मुलींवरील अत्याचारावर फक्त भाषणं करण्याऐवजी त्यावरील कायद्यांची प्रभावी अमलबजावणी व्हावी, असं वाघ म्हणाल्या.


कठोरात कठोर शिक्षा केली जाईल गृहमंत्री : दिलीप वळसे पाटील


राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा केली जाईलच, पण त्यापुढे जाऊन यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा ही तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. तसा अहवाल वेळोवेळी पोलीस सादर करतील, असं वळसे पाटील म्हणाले.


दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी- देवेंद्र फडणवीस


या घटनेवर संताप व्यक्त करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील साकीनाका भागात निर्भयासारखी घटना ऐकून मन सुन्न झाले. कलम 144 फक्त गणेशभक्तांसाठीच का? असा सवाल त्यांनी केला आहे. वाढते महिला अत्याचार थांबविण्यासाठी कोणते कलम आणि केव्हा लावणार? असा सवाल करत दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 


शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या होत्या की, पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ती बेशुद्ध आहे. एक शस्त्रक्रिया झाली आहे. मध्यरात्री हा प्रकार झाला आहे. या प्रकरणी आरोपी देखील पकडला गेला आहे. हे क्लेषदायक आहे, संतापजनक आहे. वाईटातली वाईट शिक्षा त्या आरोपीला मिळाली पाहिजे. त्या महिलेला त्वरित मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू असं कायंदे म्हणाल्या.


आरोपीला भादंविच्या कलम 307, 376 अंतर्गत अटक करण्यात आली
काही पुराव्यांच्या आधारे आरोपीला भादंविच्या कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. घटनेसंबंधी पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.