मुंबई : मुंबई पोलिसांनी तीन चोरांना अटक केली आहे. पण हे साधेसुधे चोर नाहीत, चोरी केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी या चोरांनी नामी शक्कल लढवली होती. हे चोर चोरी केल्यानंतर टक्कल करुन घ्यायचे, जेणेकरुन पोलिसांना त्यांची ओळख पटू शकणार नाही. एवढंच नाहीतर पोलीस आम्हाला कधीच पकडू शकत नाही, असा त्या चोरांना विश्वास होता. अशातच पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 


आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी आणि सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत होत्या. या घटनांना लगाम लावण्यासाठी आरे पोलिसांनी कंबर कसली होती. 24 मार्चला आरे येथील विर्वानी इंडस्ट्री येथे आरे पोलीस स्टेशनचं गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत होतं. त्याचवेळी त्यांना बाईक वरून येताना दोन संशयास्पद इसम दिसले. त्यांच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पाठलाग करून फिल्मी स्टाईलमध्ये त्या चोरांना पकडलं. मात्र यांना अटक केल्यानंतर जी माहिती समोर आली त्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


पोलिसांनी आधी आरिफ खाटीक वय 20 आणि रागावत चव्हाण वय 19 या दोन आरोपींना अटक केली आहे. दोघांच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीनंतर या गुन्ह्यातील मास्टर माईंड अब्दुल अली शेख वय 21 याचं नाव समोर आलं. पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवत त्यालाही अटक केली. या चोरांची कसून चौकशी केली असता. चोरांनी त्यांच्या चोरीच्या पद्धतीचा खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिनही चोर वेगळ्या पद्धतीनं चोरी करत होते. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी हे चोर चोरी केल्यानंतर टक्कल करुन घ्यायचे. जेणेकरुन पोलिसांना त्यांची ओळख पटू शकणार नाही. अखेर पोलिसांनी आरे पोलीस स्टेशननच्या हद्दीत चोरीचा सपाटा लावलेल्या चोरांना जेरबंद केलं आहे. या चोरांकडून पोलिसांनी चार दुचाकी आणि 14 मोबाईल असा एकूण तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :