Lok Sabha Election Phase 5 Voting : नवी दिल्ली : देशभरात आज लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा पार पडत आहे. आज देशभरातील 49 जागांवर मतदान प्रक्रिया (Voting Process) पार पडत आहे. देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video On Social Media) होणाऱ्या एका व्हिडीओनं खळबळ माजली आहे. एकाच व्यक्तीनं एक नाही, दोन नाही तर तब्बल आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी एपआयआर दाखल करण्यात आला आहे. 


उत्तर प्रदेशातील एटामध्ये एका व्यक्तीनं 8 वेळा मतदान केल्याचा दावा केला आहे. याबाबतचा व्हिडीओही या व्यक्तीनं बनवला होता. अशातच आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगानं केली आहे. यासोबतच या व्यक्तीनं ज्या पोलिंग बुथवर मतदानाचा हक्क बजावला होता, त्या सर्व सदस्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच, उत्तर प्रदेशच्या उर्वरित टप्प्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


व्हायरल व्हिडीओ प्रकरणाबाबत माहिती देताना उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितलं की, "घटनेचा एफआयआर एटा जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 171-एफ आणि 419, आरपी कायदा 951 च्या कलम 128, 132 आणि 136 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अनेक वेळा मतदान करताना दिसणारा व्यक्ती राजन सिंह, अनिल सिंह यांचा मुलगा असून, खिरिया पमरण गावातील रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे."






आठ वेळा मतदान करणारा तरुण अटकेत 


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एटा जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वेळा मतदान करणारी व्यक्ती खिरियाच्या पमरण गावचा रहिवाशी असून त्याचं नाव राजन सिंह असं आहे. पोलिसांनी राजनला अटक केली आहे. 


व्हिडीओमध्ये काय दाखवलंय?


व्हिडीओमध्ये एक तरुण ईव्हीएमजवळ उभा आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण 8 वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, निवडणूक आयोगाला हे चुकीचं वाटत असेल तर काहीतरी कारवाई करावी, अन्यथा… भाजपची बूथ कमिटी ही खरे तर लूट कमिटी आहे, असंही लिहिलं आहे. तसेच, राहुल गांधी यांनीही हा व्हिडीओ ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. 


राहुल गांधी ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, आपला पराभव समोर पाहून भाजपला जनादेश नाकारण्यासाठी सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही लुटायची आहे. निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी सत्तेच्या दबावाला सामोरं जाताना आपली घटनात्मक जबाबदारी विसरू नये, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. अन्यथा, भारताचं सरकार स्थापन होताच, अशी कारवाई केली जाईल की, भविष्यात कोणीही 'संविधानाच्या शपथेचा' अवमान करण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 227 कोट्यधीश उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, महाराष्ट्रातून कोण?