Kolhapur: कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तंबाखूला लावण्यासाठी चुना का मागितला म्हणून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या वादात चाकूने भोकसून एकाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अनिल रामचंद्र बारड असे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विकास कुंभार यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी फाट्यावर ही घटना घडली आहे. जितेंद्र खामकर आणि विकास कुंभार हे दोघे एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी तंबाखूला चुना मगितल्याच्या कारणावर आरोपी विकास कुंभार आणि जितेंद्र यांच्यात वाद झाला. हा वाद खूप विकोपाला गेला. वादानंतर आरोपी विकास याने जितेंद्र याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. 


विकास कुंभार याने दिलेल्या धमकीनंतर जितेंद्र खामकर याने आपला मामा अनिल रामचंद्र बारड यांना घेऊन जाब विचारण्यासाठी गेला. हा जाब कुंभारवाडी इथल्या चौकात विचारण्यात आला. यावेळी वाद मिटण्याऐवजी वाद आणखी वाढला. आरोपी विकास हा आणखीनच आक्रमक झाला. विकास याने जितेंद्र आणि अनिल या मामा भाच्याला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली आणि स्वतःच्या मोटारसायकलवर असलेला चाकू हातात घेतला.आक्रमक झालेल्या विकासाने हा चाकू मामा अनिल याच्या पाठीत उजव्या बाजूला खुपसला. सलग दोन वेळा विकास याने चाकू अनिल यांच्या पाठीत खुपसला. त्यामुळे अनिल रामचंद्र बाराड हे जागीच कोसळले. या घटनेनंतर त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी अनिल यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :