Haridwar Live-In Crime Story : विवाहित महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराला प्रेमात जीव गमवावा लागल्याची घटना हरिद्वारमध्ये घडली आहे. नवऱ्याला सोडून आलेल्या महिलेशी हरिद्वारमधील एका आश्रमात भेट झाली, त्यानंतर त्या भेटीचे रुपांतर प्रेमात झालं. नंतर ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले. पण नंतर त्या महिलेचा विचार बदलला आणि तिने पतीसोबत मिळून प्रियकराचाच काटा काढल्याची घटना घडली. जेवणातून विष घालून प्रियकराची हत्या केल्याची घटना हरिद्वारमध्ये घडली. 


हरिद्वारमधील एका बंद घरातून सडका वास येऊ लागल्यानंतर शेजारच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी ते घर उघडले असता त्या ठिकाणी एक मृतदेह आढळला. पोलिसांनी त्या मृतदेहाचा पंचनामा केला. तो मृतदेह कोणाचा होता, त्याचा मृत्यू कसा झाला आणि त्या घरात काय घडले असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले होते. 


सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास लागला


पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्यात विष प्राशन करून मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्या भागातील छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले. सर्वांच्या लिंक जोडल्यानंतर फुटेजमध्ये रात्रीच्या अंधारात एक महिला आणि एक पुरुष संशयास्पद स्थितीत त्या भागातून पळताना दिसून आले. 15 दिवसांनी त्या महिला आणि पुरुषाला अटक केल्यानंतर या प्रकरणाचं गुढ उकललं.


महिला पतीला सोडून प्रियकरासोबत लिव्ह-इनमध्ये राहायची


पोलिसांनी त्या दोघांची चौकशी केली असता यामागे अनैतिक संबंधांची कहाणी असल्याचे समोर आलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलेच्या पतीची एन्ट्री झाली आणि त्यानंतर प्रियकराचा खून झाल्याचं स्पष्ट झालं. ज्या व्यक्तीची हत्या झाली त्याचं नाव लक्ष्मण असं आहे. तर हत्येकरी पती-पत्नीचे नाव मधू राय आणि अंजू देवी असं आहे. लक्ष्मण हरिद्वारमध्ये अंजूसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.


अंजूचा विवाह झारखंडमधील मधू राय याच्याशी सुमारे 9 वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर मधू पत्नीसोबत घरजावई म्हणून राहू लागला आणि काही दिवसांनी दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. त्या दरम्यान या जोडप्याला एक मुलगाही झाला.


जेव्हा  या दोघांमध्ये भांडणे वाढू लागली तेव्हा अंजूने घर सोडले आणि यूपीच्या बरेलीमध्ये राहू लागली. येथे त्यांची भेट लक्ष्मण नावाच्या व्यक्तीशी झाली आणि दोघांमधील जवळीक वाढू लागली. एके दिवशी लक्ष्मण अंजूसोबत त्याच्या पिलीभीत येथील घरी गेला. मात्र त्याच्यासोबत एका विवाहित महिलेला पाहून त्याचे कुटुंबीय संतापले. त्यानंतर लक्ष्मण आणि अंजू उत्तराखंडमधील हरिद्वारला आले आणि भाड्याने खोली घेऊन लिव्ह-इनमध्ये राहू लागले.


अंजूचे मन बदलले आणि प्रियकराचा घात झाला


हरिद्वारमध्ये एके दिवशी सत्संग सुरू असताना अंजूला त्याचा पती मधू भेटला. यावेळी त्यांचा आठ वर्षांचा मुलगाही सोबत होता. त्या दोघांना पाहून अंजूचे मन बदलले आणि तिने पुन्हा एकदा मधूसोबत संसार करण्याचा निर्णय घेतला. 


या पती-पत्नीने शेजारची खोली भाड्याने घेतली आणि तिथेच राहू लागले. यावर प्रियकर लक्ष्मणने विचारल्यानंतर अंजूने भाऊ आणि भाच्यासोबत राहत असल्याचं सांगितलं. पण हे खोटं जास्त काळ टिकू शकलं नाही. लक्ष्मणला सत्य समजलं आणि त्याचे अंजूसोबत वारंवार खटके उडू लागले. यातून लक्ष्मण अंजूला मारहानही करू लागला. 


त्यानंतर अंजू आणि तिच्या पतीने एक प्लॅन बनवला आणि लक्ष्मणच्या जेवणात विष घातलं. जेवणानंतर काहीच क्षणात लक्ष्मणचा मृत्यू झाला. त्यानंतर अंजू आणि मधूने ते घर बाहेरून बंद केलं. 


सीसीटीव्ही तपासल्यानंतर या दोघांपर्यंत पोलिस पोहोचले आणि त्यांना अटक केल्यानंतर या हत्येमागचं रहस्य उलगडलं. 


ही बातमी वाचा: