मुंबई : 26/11 दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे (Hemant Karkare), विजय साळसकर (Vijay Salsakar), अशोक कामटे (Ashok Kamte) यांचा जीव घेणाऱ्या गोळ्या कसाबच्या (Kasab) होत्या का की त्यांचा खून झाला? यासंदर्भात उज्ज्वल निकम यांनी सत्य सांगावं, असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मागच्या पत्रकार परिषदेत उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना प्रश्न विचारले होते. मुंबईवर हल्ला झाला होता, त्यासंदर्भात प्रश्न विचारले होते. हेमंत करकरे, साळसकर, कामटे यांचा हल्ल्यात गोळ्या लागून मृत्यू झाला होता. गोळ्या कोणाच्या होत्या, कसाब किंवा अबु ईस्माईलच्या बंदुकातल्या होत्या का? यासंदर्भात खुलासा करावा, अशी विनंती केली होती. देशाशी इमान राखावा, यासाठी खुलासा करणं आवश्यक आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.


कुठल्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी दबाव होता का? 


उज्ज्वल निकम यांनी केस चालवली, त्यात दुमत नाही. कसाबला दोषी करण्यात आलं होतं. 302 कलमाअंतर्गत नारायण सोळंकी, रहमतुल्ला इब्राहिम, अंबादास पवार, अब्बास अन्सारी, तुकाराम ओंबळे ह्या सात जणांना खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरलं गेलं. आयपीएस अधिकाऱ्यांचा देखील खून झालाय, मात्र फायनल ऑर्डरमध्ये त्यांची नावंच नाहीयत. काही अधिकारी यात होते, त्यात कोर्टासमोर, ही माहिती का आणली नाही, हा प्रश्न आहे. कसाब आणि इस्माईलनं वापरलेल्या बंदुकीतून त्यांनी कुठल्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी दबाव होता का? असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.


उज्ज्वल निकम यांनी खुलासा करावा


आता तुम्ही उमेदवार आहात. आता कोणाचा देखील तुमच्यावर दबाव नसेल, त्यामुळे तुम्ही सांगाल. प्रामाणिकपणे त्यांनी सांगावं की, कुणी त्यांच्यावर दबाव आणला होता का? त्या वेळचं सरकार काँग्रेसचं होतं, एनसीपी पण सरकारमध्ये होतं. हेमंत करकरेंच्या सोबतची कॉन्स्पिरसी आणि साळकरांच्या सोबतच्या कॉन्स्पिरसीसंदर्भात का नाही बोललात. केस निकमांनी चालवली, मात्र त्यात करकरे, साळसकर आणि कामटे यांच्या संदर्भातले पुरावे समोर येऊ दिले नाही. जयचंद कोण आहे? याचा उल्लेख निकम यांनी करावा. ते उमेदवार राष्ट्रभक्त संघटनेचे पक्षाचे आहेत, त्यांनी त्यांचा मान राखावा आणि त्यासंदर्भात खुलासा करावा. त्यावेळी हे मुद्दे चर्चेला आले, कांग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत होते, विरोधी पक्ष भाजप होता, त्यांनी हा मुद्दा काढला नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलं आहे.


पाकिस्तान हल्ला करणार, हे आधीच माहिती होतं


प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, हल्ला पाकिस्तानने केलाय, हल्ल्यातला हल्ला, अशी आमची थेअरी आहे. आमचं म्हणणं आहे, पाकिस्तान हल्ला करणार, हे समोरच्याला माहिती होतं. त्यामुळे पाकिस्तानसोबत कोण आहे, हे त्यातूनच कळेल. मग ती संघटना आहे की व्यक्ती आहे? कोर्टात पुरावे का सादर केले नाही, हा प्रश्न आहे. आम्ही संसदेत गेल्यावर हा मुद्दा समोर आणू. या निवडणुकीत त्यांनी उत्तर दिलं नाही तर, लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की, मतदान त्यांना का करायचं? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


रोड शो आधी घाटकोपर दुर्घटनेतील आरोपींवर कारवाई व्हायला हवी


ज्या घाटकोपरला रोड शो करत आहेत, तिथे एक घटना घडली आहे. भाजप सरकारचं सत्ता असताना घटना घडलीय. अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही होणार? रोड शो आधी कारवाई होणार की नाही, हा प्रश्न आहे. एका बाजूला मयत आहे तर, दुसरीकडे रोड शो होतोय. उद्धव ठाकरेंनी जबाबदारी याची स्वीकारली पाहिजे, ब्लेम गेम करण्यात अर्थ नाही आहे. उद्धव ठाकरेंची सेना पालिकेत सत्तेत होती, त्यामुळे त्यांना गोष्टी टाळता येणार नाही.


पंतप्रधान मोदी आणि जिरेटोप वाद


व्यक्तीगत राजकारणासाठी खेळखंडोबा होतोय. एखाद्याला काही माहिती नसेल की, काय गरीमा आहे. लोकांच्या भावना जुळल्या असतात. महाराष्ट्रातील जनतेनं आता हे लक्षात घ्यायला हवं की, यावरुनच कळतं. मोदींना महाराष्ट्र किती माहिती आहे, अशी आंबेडकरांनी कोपरखळी दिली आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदींच्या डोक्यावर जिरेटोप घातला. एखाद्याचा सन्मान करायचा असेल तर, जिरेटोप ही खास पगडी डोक्यावर न घालता हातात द्यावी लागते, असं मानलं जातं. यानंतर यावर टीका करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Vijay Wadettiwar: हेमंत करकरेंच्या शरीरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, संघाशी संबंधित पोलिसाच्या पिस्तुलातील; त्या वक्तव्यावर वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण