लातूर : सुनेच्या गैरकृत्यास विरोध करणाऱ्या सासूला जिवाला मुकावे लागले आहे. सुनेनं मुलास हाताशी धरून सासुचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार लातुरात घडला आहे. याप्रकरणी निलंगा पोलिसांनी सुनेला आणि नातवाला अटक केली आहे.


लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा या गावात दोन दिवसांपूर्वी रुक्मिणबाई राजाराम माने (वय वर्ष 75) या महिलेचा मृत्यू झाला. रुक्मिणबाई यांचा मुलगा शिवाजीला आईचा मृत्यू नैसर्गिक नाही असा संशय आला. त्याच्या संशयची सुई पत्नी ललिता आणि मुलगा गणेश यांच्यावर होती. त्याला कारण म्हणजे शिवाजी हा शासकीय नौकरित आहे. मात्र पत्नी ललिता ही त्याच्यापासून फारकत घेऊन बाजुलाच राहते. शिवाजी आई रुक्मिणबाई यांच्या बरोबर राहत होता. पोटगी मिळत असतानाही पत्नीने घरावर कब्जा केला होता. शिवाजी दिसवभर बाहेर असायचा त्यावेळी ललिता गैरकृत्य करत असे. आपल्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या या गैरकृत्यांना सासू रुक्मिणबाई या विरोध करायच्या. 


सासूकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या विरोधाचा राग मनात ठेवून ललिताने मुलगा गणेशला हाताशी घेऊन रुक्मिणबाईंचा गळा आवळून खून केला. सकाळी रुक्मिणबाई मृतवस्थेत घरात आढळून आल्या. रात्री ठणठणीत असणाऱ्या आईचा खून झाल्याचा संशय मुलगा शिवाजीला आला. त्यानं तत्काळ पोलिसांत धाव घेत निलंगा पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल केली. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. प्राथमिक अहवालात अनैसर्गिक मृत्यू असल्याचे निष्पन्न झाले. शिवाजीला असलेल्या संशयामुळे पोलिसांनी त्याची पत्नी ललिता आणि मुलगा गणेश यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. 


सासू रुक्मिणबाई बाजुलाच असलेल्या घरातून सुनेची गैरकृत्य पहात होती. तसेच वेळोवेळी सुनेला विरोध करत होती. त्यामुळे तिचा मी काटा काढला अशी कबूली सून ललिता हिने पोलिसांसमोर दिली आहे. या कृत्यात मुलगा गणेश याने आईला मदत करत आजीचा खून केला असल्याचंही निष्पन्न झालं. निलंगा पोलिसांनी शिवाजी माने यांच्या तक्रारीवरुन रितसर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :