ठाणे : भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली असून भावाचे अपहरण करण्यात आलं तर तरुणीवर दोन वेळा बलात्कार करण्यात आला. भावाचे अपहरण करत त्यास मारहाण करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा बहिणीला खोटे कारण सांगून बोलावून घेत तिच्यावर दोन वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात सहा नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ पसरली आहे.


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी शहरातील शांतीनगर परिसरातील फातमा नगर येथे राहणारी 22 वर्षीय तरुणी तिच्या आतेबहिणीकडेकडे गेली होती. रात्रीच्या सुमारास तिला भावाचे 15 मिस्कॉल आले होते. 12 वाजताच्या सुमारास तिला अचानक जाग आली असता तिने मोबाईल मधील मिस्कॉल बघून भावाकडे चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यावेळी   भावाने माझी तब्येत बरी नाही तू बागे फिरदौस या ठिकाणी ये असं सांगितलं.


दबा धरून बसलेल्या आरोपींचा अत्याचार 


पीडित तरुणी आपल्या ओळखीच्या रिक्षावाल्या सोबत बागे फिरदौस येथे आली. त्याठिकाणी अगोदरच दबा धरून बसलेले आरोपी सदरे उर्फ मोहम्मद सईद आलम, पाशा, लड्डू ,गोलू आणि इतर दोन जण (सर्व रा.फातमा नगर) यांनी आपसांत संगनमत करून पीडितेसह तिचा भाऊ आणि रिक्षा चालक यांना मारहाण केली. त्यांचे अपहरण करत जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून नागाव येथील जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या झाडाझुडपात पीडितेस नेऊन तिच्यावर आळीपाळीने जबरदस्तीने सामूहिक अत्याचार केला.


एवढे करूनही नराधमांनी भूक न शमल्याने त्यानंतर नराधमांनी तिला पुन्हा फातमा नगर येथे नेले. तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीमध्ये पुन्हा तिच्यावर जबरदस्तीने आळीपाळीने बलात्कार केला. नंतर धमकावून पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षा चालक यांना सोडून ते पसार झाले.


या घटने नंतर भयभीत पीडित तरुणीने भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपल्या बरोबर घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पहिला गुन्हा शांतीनगर पोलिस ठाण्यात घडला असल्याने तो शांतीनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पोलिसांनी या बाबत बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. इतर फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. 


ही बातमी वाचा: