Laxman Utekar : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या शौर्यावर आणि बलिदानावर आधारित असलेला छावा (Chhava) हा सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. दरम्यान, सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पाहायला मिळतोय. दरम्यान, छावा सिनेमात शिर्के घराण्यावर गद्दारीचा शिक्का बसला. शिवाय संभाजी महाराजांना पकडण्यासाठी शिर्के घराण्याने मदत केली, असंही दाखवण्यात आलं. त्यानंतर याच मुद्यावरुन राजेशिर्के घराणं संतापलेलं पाहायला मिळालं. आमच्या घराण्याबाबतचे सीन वगळा, अशी मागणीही राजेशिर्के घराण्याने केली. शिवाय, हा सीन हटवला नाही तर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आता लक्ष्मण उतेकर यांनी शिर्के घराण्याची माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, त्यांनी सिनेमातील ऐतिहासिक मुद्द्यांवर स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
पैसे कमवण्यासाठी हा सिनेमा बनवण्याची गरज नव्हती - लक्ष्मण उतेकर
उक्ष्मण उतेकर म्हणाले, कदाचित मी चुकीचा नसेल तर यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आलेल्या टीव्ही मालिकेतही तसंच दाखवण्यात आलेलं होतं. कादंबरी म्हणजे शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट लोकांना दाखवला जातो. मात्र, माहिती तीच असते. मी दिग्दर्शक म्हणून मी काहीही ट्वीस्ट केलेला नाही. छावा या कादंबरीमध्ये गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के, त्यांचं कुलदैवत कोणतं? या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. ते पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. आम्ही सिनेमात त्यांचं गाव देखील दाखवलेलं नाही. ते खबर मी नक्कीच घेतली आहे. कारण मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. तो उद्देश चित्रपटाचा नव्हता. पैसे कमवण्यासाठी हा सिनेमा बनवण्याची गरज नव्हती. माझ्याकडे भरपूर विषय होते.
चित्रपटाची कथा, पटकथा छावा कादंबरीमध्ये लिहिलंय तसंच आम्ही रंगवण्याचा प्रयत्न केलाय : लक्ष्मण उतेकर
पुढे बोलताना लक्ष्मण उतेकर म्हणाले, आदरणीय भूषणजी पहिल्यांदा तर खूप सॉरी मी तुमचा फोन काल उचलला नाही. कारण मी रेंज नसलेल्या भागात होतो. मी तुमची पत्रकार परिषद पाहिली. तुमचा मेसेजही मी वाचला. सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो. जर नकळत तुमच्या भावना दुखावला गेल्या असतील. सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो, त्यामध्ये सुरुवातीलाच लिहिलं आहे की, हा सिनेमा छावा या कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली होती. त्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा छावा कादंबरीमध्ये लिहिलंय तसंच आम्ही रंगवण्याचा प्रयत्न केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या