PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. देशातील 1 लाख तरुणांना राजकारणात (politics) आणणार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते वाराणसीमध्ये बोलत होते. कुटुंबवादामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठी आम्ही अशा 1लाख तरुणांना राजकारणात आणण्याचा संकल्प केला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते 6700 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसीमध्ये मोठी घोषणा केली. देशातील 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचे ते म्हणाले. ज्यांच्या कुटुंबाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या तरुणांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवले जाईल असेही पंतप्रधान म्हणाले. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते 6700 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचे उद्घाटन झाले. तिसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा वाराणसी दौरा होता. या भेटीदरम्यान त्यांनी आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले. तसेच शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांची प्रकृतीची देखील  जाणून घेतली.


कुटुंबवादामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान


दरम्यान, पंतप्रदान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी कुटुंबवादावर टीका केली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कुटुंबवादामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठी आम्ही अशा एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याचा संकल्प केला आहे, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवले जाईल. आमच्या सरकारमध्ये कोणाशीही भेदभाव केला जात नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारताला जातीय आणि घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशातील तरुण राजकारणात आल्यामुळं लोकशाही अधिक मजबूत होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.


एनडीए सरकारने कोणाचाही हक्क हिरावून घेतला नाही


आपल्या भाषणात राम मंदिराच्या उभारणीचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जाईल, असे आम्ही सांगितले होते. आज लाखो लोक रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सरकारने तिहेरी तलाकपासून स्वातंत्र्य आणि महिलांना आरक्षण देण्याचे काम केले आहे. एनडीए सरकारने कोणाचा हक्क हिरावून घेतलेला नाही, गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्याचे कामही केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Election : दिवाळीनंतर वात पेटवणार, महाराष्ट्रात सभांचा धडाका लावणार, PM मोदींच्या किती सभा होणार?