केरळ : माणसाचं आयुष्य हे मोठं असंबद्ध असतं. या आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. हे आयुष्य जरी अनाकलनीय असलं तरी या जगात जगणारी माणसंही तेवढीच ताजी, संवेदनशील आहेत. त्याचाच प्रत्यय सध्या केरळमध्ये आला आहे. पोटापाण्याची सोय म्हणून नोकरीसाठी सौदी अरेबियात गेलेला तरुण एका चुकीमुळे तिथेच फसला. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. आयुष्याने त्याला वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवलं. पण केरळमधील लोकांनी त्याच्या सुटकेसाठी तब्बल 34 कोटी रुपये जमा केले आहेत. जात, धर्म, पंत, भेद असं सर्वकाही विसरून लोकांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले आहेत. त्याला मदत म्हणून उद्योगपतींपासून ते कामगारांपर्यंतच्या लोकांनी मदत केली आहे. आता हेच 34 कोटी या तरुणाची सुटका होणार आहे. 


नेमकं प्रकरण काय आहे? 


सध्या सौदी अरेबियात अडकलेल्या या तरुणाचे नाव अब्दुल रहीम आहे. ते मुळचा केरळमधील कोडामपुझा येथील रहिवासी असून ऑटोरिक्षा चालवायचे. नोव्हेंबर 2006 मध्ये ते सौदी अरेबियात गेले होते. तेथे ते अब्दुल्ला अब्दुरहमान अल शाहिरी नावाच्या व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून काम करू लागले. या व्यक्तीचा आनस अल शाहिरी नावाचा एक दिव्यांग मुलगा होता. या मुलाच्या देखभलाचीही जबाबदारी रहीम यांच्यावरच सोपवण्यात आली होती. 


अन् रहीम यांच्याकडून एक चूक झाली


रहीम यांना सौदी अरेबियात जाऊन एक महिनाही झाला नव्हता. सौदीमध्ये जाताना त्यांनी उराशी अनेक स्वप्न बाळगली होती. मात्र या महिन्याभरातच त्यांच्याकडून नकळतपणे एक चूक झाली. दिव्यांग मुलाच्या गळ्यावर श्वास घेण्यासाठी एक पाईप लावण्यात आला होता. याच पाईपला रहीम यांचा हात लागला आणि तो निघून पडला. या दुर्गघनेनंतर तो दिव्यांग मुलगा बेशुद्ध पडला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.


तब्बल 34 कोटी रुपयांत सुटका 


पुढे रहीम यांच्यावर खटला भरण्यात आला आणि खुनाच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं. रहीम यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. वरच्या न्यायालयानेदेखील ही शिक्षा कायम ठेवली. रहीम यांची शिक्षा माफ व्हावी यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न केले. मात्र त्याची शिक्षा माफ करण्यात आली नाही. शेवटी तोडगा म्हणून रहीम यांच्या सुटकेसाठी 16 एप्रिलपर्यंत तब्बल 15 दशलक्ष सौदी रियाल (34 कोटी) देण्याचा निर्णय घेण्यात आला.


आईला वाटला 34 कोटी जमवणं केवळ अशक्य


याच 34 कोटी रुपयांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून रहीम यांच्या कुटुंबीयांकडून प्रयत्न चालू होते. गेल्या 18 वर्षांपासून त्याच्या परिवाराकडून 34 कोटी रुपये उभारण्यासाठी धडपड केली जात होती. यात केरळच्या नागरिकांनीही तेवढ्याच तळमळतेने पुढे येत सढळ हातांनी मदत केली. माझ्या मुलाला वाचवण्यासाठी 34 कोटी रुपये उभे करणे हे केवळ अशक्य आहे, असे रहीम यांच्या आईला वाटत होते. मात्र केरळच्या नागरिकांनी जात, धर्म, पंत, वर्ग असं सगळंकाही विसरून रहीमच्या सुटकेसाठी पैशांच्या रुपात मदत केली आहे. आज रहीम यांच्या आईकडे 34 कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न झाले आहेत. याच पैशांतून आता रहीम घरी परतरणार आहेत. 


पैसे जमा करण्यासाठी विशेष मोहीम


फातिमा यांनी रहीमला गेल्या 18 वर्षांपासून पाहिलेलं नाही. हे पैसे जमा होऊ शकतील, असं त्यांना कधीही वाटलं नव्हता. मुलाच्या सुटकेचा आनंद आज त्यांच्या डोळ्यांत दिसतोय. हा निधी जमा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने एक अॅप तयार केले होते. या अॅपच्या माध्यमातून देणगिदारांना त्यांनी दिलेले पैसे रहीम यांच्या आईपर्यंत पोहोचले की नाही, हे समजत होते. 1000 सदस्य असलेले पाच व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले होते. समाजमाध्यमावरही निधी उभारणीसाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्या होत्या.


केरळवासीयांचे सर्व स्तरातून स्वागत 


दरम्यान, आता रहीम लवकरच घरी येणार आहेत. त्यांची संपूर्ण केरळ आतुरतेने वाट पाहतोय. रहीम यांच्या कुटुंबीयांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने रहीमच्या सुटकेसाठी तब्बल 34 कोटी उभे करणाऱ्या केरळवासीयांचेही सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. 


हेही वाचा :


रतन टाटांनी लग्न केलं नाही, पण मागे मोठा परिवार; कोट्यवधींचं साम्राज्य सांभाळणाऱ्या 'या' सदस्यांविषयी जाणून घ्या!


आधी 12 आता थेट 214 रुपये! 'या' कंपनीच्या शेअरची कमाल, पैसे गुंतवल्यास व्हाल मालामाल!


चार वर्षांत एका लाखाचे झालेत तब्बल 45 लाख, छप्परफाड रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीविषयी माहिती आहे का?