मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेअर्स विकल्यानंतर संबंधित रक्कम डिमॅट खात्यात येण्यासाठी गुंतवणूकदारांना आता दोन दिवस वाट पाहावी लागणार नाही. देशातील सर्वात मोठ्या 200 सूचीबद्ध कंपन्या आता सेटलमेंटच्या T+1 सायकलमध्ये शिफ्ट झाल्या आहेत. शुक्रवार 27 जानेवारीपासून रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि अदानी एंटरप्रायझेस T+1 च्या आधारावर व्यवहार करतील. यापूर्वी हा व्यापार सेटलमेंट T+2 दिवसांच्या आधारावर म्हणजे दोन दिवसांच्या आधारावर केला जात होता.


भारत आता T+2 सेटलमेंटवरून T+1 सेलटमेंटकडे शिफ्ट होतोय. सर्वात कमी मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांमध्ये याची अंमलबजावणी फेब्रुवारी 2022 पासून झाली आहे. चीननंतर आता भारत हा एकमेव देश आहे जो T+2 सेटलमेंट लागू करणार आहे. 


 






What Is T+1 Settlement cycle: T+1 सेटलमेंट सायकल काय आहे? 


T+1 सेटलमेंट म्हणजे सिक्युरिटीची विक्री किंवा खरेदी तुमच्या डीमॅट खात्यात ज्या दिवशी तुम्ही ट्रेड फायनल केला असेल त्याच दिवशी झाल्याचं दिसून येईल. पूर्वी यासाठी दोन दिवस लागायचे. सप्टेंबर 2021 मध्ये SEBI ने एक्सचेंजला अधिक स्थिरता प्रदान करण्यासाठी T+1 आणि T+2 सेटलमेंट निवडण्याची संधी दिली होती.


गुंतवणूकदारांना काय फायदा होईल?


T+1 सेटलमेंटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो गुंतवणूकदारांना चांगली लिक्विडिटी देतो. त्यामुळे शेअर्सची विक्री झाल्यानंतर केवळ एकाच दिवसात खात्यात पैसे जमा होतात. जर एखाद्या गुंतवणूकदाराने आज शेअर विकला तर उद्या पैसे त्याच्या डिमॅट खात्यात दिसू लागतील. जितक्या लवकर पैसे डिमॅट खात्यात परावर्तित होतील तितक्या लवकर तो ते काढू शकेल. यानंतर तो त्यांची पुन्हा गुंतवणूक करू शकतो किंवा त्याच्या इतर कोणत्याही वैयक्तिक कामाची पूर्तता करू शकतो.


ही प्रणाली कुठे लागू आहे?


T+1 सेटलमेंट  लागू करणारा भारत हा जगातील चीननंतर दुसरा देश आहे. युरोप, अमेरिका आणि जपानमध्ये अद्यापही T+2 सेटलमेंट लागू केली जात आहे. त्यामुळे भारताने T+1 सेटलमेंट लागू करुन यामध्ये बाजी मारल्याचं दिसून येतंय.