मुंबई : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्वस्त खाद्यपदार्थांमुळे मे 2022 मध्ये किरकोळ महागाई कमी झाली आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई दर 7.04 टक्क्यांवर होता, तर एप्रिलमध्ये 7.79 टक्के होता. आरबीआयचं पतधोरण आणि सरकारे इंधनाच्या दरामध्ये केलेली कपात याचा परिणाम महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो आहे असं जाणकारांचे मत आहे. 


नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित (CPI) महागाई दर 7.79 टक्के होता. गेल्या वर्षी मे महिन्यात किरकोळ महागाई 6.3 टक्के होती. एप्रिलमधील 8.31 टक्क्यांच्या तुलनेत मे महिन्यात अन्नधान्य महागाई दर 7.79 टक्के होता.


आरबीआयचा अंदाज, 2022-23 मध्ये किरकोळ महागाई 6.7%


या महिन्यात पतधोरण आढाव्यात, रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील महागाईचा अंदाज 5.7 टक्क्यांवरून 6.7  टक्क्यांवर नेला आहे. चलनविषयक धोरणाचा विचार करताना केंद्रीय बँक प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा विचार केला होता.


रेपो दर 36 दिवसांत दोनदा वाढला


महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने महिन्याभरात व्याजदरात सुमारे 1 टक्क्यांनी वाढ केली आहे. खरं तर, 8 जून 2022 रोजी, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ जाहीर केली आणि तो 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के केला. यापूर्वी, 4 मे 2022 रोजी मध्यवर्ती बँकेने रेपो दर 4.00 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांनी वाढवून 40 बेस पॉईंट्स केला होता.


दोन टक्क्यांच्या तफावतीने चलनवाढ चार टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी सरकारने रिझर्व्ह बँकेला दिली आहे. त्यामुळे आता आगामी काळात पतधोरण आणि राजकीय निर्णय कशापद्धतीने घेतले जातात आणि महागाई कशापद्धतीने आवाक्यात ठेवली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे.